ऑनलाईन टीम / जळगाव :
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या पाटणादेवी परिसरात ढगफुटी झाली आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे चाळीसगाव परिसरातून वाहणाऱया गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाटणादेवी परिसरातील पाच गावे पूराच्या पाण्याने वेढली गेली असून, वीज पुरवठा खंडीत झाला असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
कन्नड घाटात दरड कोसळली
औरंगाबाद आणि जळगाव जिह्याला जोडणाऱया कन्नड घाटात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. त्यातच घाटात अनेक ठिकाणी मोठी दरड कोसळल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरड कोसळल्यामुळे धुळे-औरंगाबाद -सोलापूर महामार्ग बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी औरंगाबादला जाण्यासाठी चाळीसगावमार्गे प्रवास करावा. पुण्याहून औरंगाबादला यायचे असेल तर जळगावकडून यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कन्नड घाटात दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.