मुंबई \ ऑनलाईन टीम
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये घरांवर दरड कोसळून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा हा २५ वर गेला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबूरमधील दुर्घटनास्थळाची पाहणी केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
चेंबूरमधील दरड कोसळ्याच्या दुर्घटनेची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली आहे. मुंबईत रात्री जास्त पाऊस पडल्यामुळे दरड कोसळी आहे. पावसाचे पाणी जास्त आल्यानं मिठी नदीनंही धोक्याची पातळी गाठली आहे. यामुळे तिथल्या नागरिकांनाही स्थलातरण करण्यात आले आहे. चेंबूरमध्ये संरक्षण भींतीवर पाण्याचा जोर आल्यामुळे ही भींत कोसळली आहे. यामध्ये मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख आपत्ती व्यवस्थापनमधून तर १ लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून असे ५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
केंद्र सरकारकडे याबाबत मदतीची मागणी करण्यात येणार आहे. या दुर्घटनेत जे गंभीर जखमी आहेत अशा रुग्णांचा खर्च हा शासनाकडून करण्यात येणार आहे. यातील काही नागरिकांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयांत उपचार सुरु करण्यात आला आहे. त्या सर्वांचा खर्च हा शासनाकडून करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.