वास्कोत आयोजित अखिल भारतीय धनगर समाजाच्या परिषदेत प्रतिपादन
प्रतिनिधी /वास्को
दर्जात्मक शिक्षणच समाजाला विकासाची दिशा दाखवते. दर्जेदार शिक्षणावर भर द्या. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले आहे. राखीवता ही समाजाची गरज आहेच. धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश होईलच. संसद आपले काम करेल. धनगर समाजाने आपला दबाव निर्माण करायला हवा असे प्रतिपादन केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री एस.पी.सिंग बघेल यांनी वास्कोत केले.
वास्को बायणा येथील रवींद्र भवनच्या मिनी सभागृहात सोमवारी संध्याकाळी शेफर्डस् इंडिया इंटरनॅशनल या संघटेनेने अखिल भारतीय परिषदेचे आयोजन केले होते. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, राजस्तान व इतर राज्यातून धनगर समाजाचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. कन्नड भाषीक धनगर समाज बांधव अधिक संख्येने उपस्थित होते. उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी असलेले व धनगर जमातीमधील असलेले केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री प्रा. एस.पी.सिंग बघेल हे या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी खासदार व भाजपाचे ओबीसी मोर्चाचे अखिल भारतीय उपाध्यक्ष सागर रायका, महाराष्ट्राचे माजीमंत्री रामशंकर शिंदे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, कर्नाटकाचे माजीमंत्री एच.एम. रेवण्णा, गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे सन्माननिय अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. शांताराम सुर्मे, एन बी हरीश, सिध्दण्णा मेटी, शरण मेटी, डॉ. जानू झोरे, डॉ. राजन लांबोर आदी धनगर समाजाचे नेते व्यासपिठावर उपस्थित होते.
या परिषदेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे व अन्य मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलीत करून करण्यात आले. यावेळी संत कनकदास यांचे स्मरण करण्यात आले. मान्यवर पाहुण्यांना तसेच धनगर समाजाच्या हितासाठी कार्य करणाऱया व्यासपिठावरील मान्यवरांना यावेळी सन्मानीत करण्यात आले. आंध्र प्रदेश धनगर समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास जब्बाळू, लक्ष्मण कवळेकर व चंद्रकांत शिंदे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
केंद्रीयमंत्री एस.पी.सिंग बघेल यांनी यावेळी उपस्थित धनगर समाज बांधवांना मार्गदर्शन करताना दर्जेदार शिक्षण आत्मसात करण्याचा मंत्र दिला. शिक्षणानेच जगाचे टाळे खोलले जाऊ शकते. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. धनगर समाज देशात वेगवेगळय़ा नावानी ओळखला जातो. त्यामुळे त्याची खरी ओळख सहसा कुणाला होत नाही. ती ओळख निर्माण करण्यासाठी देशभरातील धनगरांनी एकत्र यायला हवे. धनगर हा प्रमाणिक म्हणून ओळखला जातो. तसेच तो कुणासमोर मान झुकवणाराही नाही. मराठे आणि पेशव्यांच्या लढायातही धनगरांनी दखल घेण्याजागे योगदान दिले असे एस.पी.सिंग बघेल यांनी काही उदाहरणांसह सांगितले. जातीने धनगर असलेल्या अहिल्ल्याबाई होळकर यांच्या पराक्रमाचा त्यांनी थोडक्यात उल्लेख केला. मोघलांनी केलेला मंदिरांचा उध्दवस्त आणि अहिल्ल्याबाई होळकरांनी केलेला शेकडो मंदिरांचा जिर्णोध्दार याची माहितीही त्यांनी दिली. आतापर्यंत चौदा धनगर राजा होऊ गेलेले आहेत. धनगर दबावापुढे झुकला नाही. धर्म परीवर्तन केले नाही. आपल्या मेंढय़ा घेऊन थेट जंगलाकडे वळला म्हणूनच तो सामाजीक आर्थिकदृष्टय़ा मागास राहिला. आपण थोरांची जयंती साजरी करतो. जनजागृती व्हावी हा त्यामागे हेतू असतो. जो आपल्या पुर्वजांचा सन्मान करत नाही तो काहीही करू शकत नाही. धनगर समाजाने आता थोडे बदलायलाही हवे. केवळ जिंदाबाद म्हणून चालणार नाही. आवश्यक तेव्हा मुर्दाबाद म्हणण्याचीही तयारी ठेवायला हवी. दबावाशिवाय काही मिळत नाही. शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा हे खरेच आहे. शिक्षण घेतल्याशिवाय संघटीत होता येत नाही आणि संघटीत झाल्याशिवाय संघर्ष करता येत नाही. शिक्षणाला फार महत्व आहे. या देशात 1947 पासूनच जर समान शिक्षण धोरण लागू झाले असते तर भारतीय समाज फार पुढे गेला असता. धनगर समाजाला राखीवता मिळायला हवी. या समाजाचा समावेश अनुसुचित जमातींमध्ये व्हायला हवा अशी देशभराची मागणी आहे. समाजाने आपला दबाव निर्माण करावा. संसदच हे काम करेल असे सांगून केंद्रीयमंत्री बघेल यांनी उपस्थित धनगर समुहाला आश्वस्त केले.
यावेळी सागर रायका यांनी संघटीत होऊन खुप काही करण्याची गरज असल्याचे सांगितले. स्पर्धात्मक परीक्षांना बसता यावे, अभ्यास करता यावा यासाठी दिल्लीत या समाजाच्या तरूणांच्या सोयीसाठी धनगर भवन उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पद्मश्री विकास महात्मे, एच. एम. रेवण्णा, राम शंकर शिंदे व बाबू कवळेकर यांनीही या परिषदेत आपले विचार मांडले. धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश व्हावे यासाठी आतापर्यंत सर्व काही करण्यात आलेले आहे. अजुनही काही करायचे बाकी असल्यास सांगा व या समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करा अशी विनंती बाबू कवळेकर यांनी केंद्रीयमंत्र्यांना केली. डॉ. शांताराम सुर्मे यांनी उपस्थित पाहुण्यांची ओळख करून दिली. सिध्दणा मेटी यांनी आभार मानले.