चिकोडी तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू झालेली गहू व हरभऱयाची रास सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. पावसाळ्यात महापूर व अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला होता. शेतात जास्त पाणी साचून राहिल्याने व वारंवार पावसाच्या सरी कोसळत असल्याने रब्बी हंगामही वाया जाण्याची शक्यता होती. पण यंदाच्या रब्बी हंगामात निसर्गाच्या कृपेने सर्वच पिके दर्जेदार आल्याने आर्थिक पाठबळ मिळाल्याचे दिसून येत आहे.
प्रत्येकवर्षी रब्बी हंगामातील पिके दर्जेदार येतात, मात्र शेतातील पिके बाजारामध्ये येईपर्यंत शेतीमालाचे भाव गडगडललेले असतात. यंदा बाजारात सोयाबीन 3700 ते 3800, ज्वारी हायबेड 2550 ते 2650, शाळू ज्वारी 2570 ते 3500, हरबरा 3700 ते 3800, गहू 1800 ते 2500, मका 1500 ते 1650, प्रति क्विंटलने विक्री होत आहे. तसेच यंदा मका 901 हेक्टर, गहू 1367 हेक्टर, हरबरा 1904 हेक्टर, ज्वारी 4940 हेक्टर क्षेत्रात पिके घेण्यात आली आहेत.
ऊस पिकाशिवाय पर्याय नाही म्हणणाऱयांना हरभरा उत्पादकांनी चांगलीच चपराक दिली होती. यंदाच्या वर्षी 30 टक्के हरभऱयाचे उत्पादन वाढले आहे. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेली रास पाहता मध्यंतरी झालेल्या वातावरणातील बदलामुळे व अवकाळीमुळे अनेक शेतकरी धास्तावले होते. पावसामुळे रास करण्यावर पाणी फिरण्याची शक्यता होती. पण निसर्गाच्या कृपेने अवकाळीचा फटका न बसल्याने शेतकऱयांना याचा लाभ झाला आहे.
पावसाळ्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने विविध पिकांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. यामुळे अनेक शेतकऱयांची पिके नाश झाली होती. याचा शेतकऱयांना आर्थिक फटकाही बसला होता. पण पावसाळ्यानंतर हरभरा, ज्वारी, मका, गहू आदी पिकांना पोषक वातावरण तयार झाल्याने उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे. उन्हाळ्यात पाण्याअभावी तर पावसाळ्यात अतिपाण्यामुळे झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन निघाल्याचे पहावयास मिळत आहे. यंदा दर कमी असला तरी उत्पादन वाढल्याने समाधान व्यक्त होत आहे.
उत्तम काटकर, एकसंबा