दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांचा इशारा
वार्ताहर/ कराड
राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. त्यातच आता मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी दलित महासंघाच्या वतीने 1 जानेवारीपासून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी दिला आहे. याबरोबरच सारथी व बार्टीप्रमाणे मातंग समाजासाठी स्वतंत्र आर्टी (अण्णाभाऊ साठे रिसर्च ट्रेनिंग सेंटर) ची निर्मिती करण्याची मागणी प्रा. सकटे यांनी केली आहे.
दलित महासंघाच्या वतीने हॉटेल अलंकार येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. सकटे यांनी ही माहिती दिली. यावेळी दलित महासंघाचे राज्य चिटणीस प्रकाश वायदंडे, जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते, तालुकाध्यक्ष दिलीप सकटे, तालुका संघटक शैलेश भिंगारदेवे, रामभाऊ दाभाडे, शिवाजी वायदंडे, आशिष मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले, अनुसूचित जाती प्रवर्गात एकूण 59 जातींचा समावेश आहे. मात्र यातील एकच प्रभावी जात आरक्षणाचा लाभ घेत आहेत. उर्वरित 58 उपेक्षित जाती आरक्षणापासून वंचित रहात आहेत. त्यामुळे आंध्रप्रदेश व तेलंगणा प्रमाणे महाराष्ट्रातही अ.ब.क.ड.प्रमाणे मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी गेली 20 वर्षांपासून मागणी होत आहे. मात्र कुठलेही सरकार या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही प्रत्येक प्रवर्गात प्रभावी जातीच आरक्षणाचा लाभ घेत असल्याने दबलेल्या, उपेक्षित जातींना आरक्षण मिळत नाही. यासाठी खास उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली आहे. त्याप्रमाणे मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, असे प्रा. सकटे म्हणाले.
मराठा समाजाच्या ‘सारथी’प्रमाणेच 59 जातीतील मुलांच्या शिक्षणासाठी बार्टी ही संस्था कार्य करते. त्याप्रमाणे दलित समाजासाठी स्वतंत्र अण्णाभाऊ साठे रिसर्च ट्रेनिंग सेंटरची (आर्टी) स्थापना करण्याची मागणी केली आहे. सरकारच्या अनेक खात्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येतात. त्यावेळी त्या खात्याच्या नेतृत्वाला दोषी धरण्यात येते. मात्र ते खाते कधी बंद करण्यात येत नाही. मात्र सहा वर्षांपूर्वी अण्णाभाऊ साठे महामंडळात भ्रष्टाचार झाल्याच्या कारणावरून हे महामंडळच बंद केले आहे. यामुळे मातंग समाजातील गरजू व होतकरू लोकांना अर्थपुरवठा होत नाही. त्यामुळे मातंग समाजाचे मोठे नुकसान होत असल्याचे प्रा. सकटे म्हणाले. याबरोबरच राज्यात वारंवार मातंग समाजावर हल्ले व अत्याचर होत आहेत. यासाठी सरकारने ठोस उपाययोजना राबवावी या मागण्यांसाठी 1 जानेवारीपासून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा प्रा. सकटे यांनी दिला आहे.