मार्गसूची प्रसिद्ध – कार्यक्रमांमध्ये 400 पेक्षा अधिक जणांच्या उपस्थितीवर निर्बंध
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना संसर्ग अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने दसरोत्सवासंबंधी मार्गसूची जारी केली आहे. म्हैसूर वगळता इतर ठिकाणी दसरोत्सव कार्यक्रमांमध्ये 400 पेक्षा अधिक जण उपस्थित राहू नयेत. गणेशोत्सवाप्रमाणे दसरा साधेपणाने साजरा करण्याची सूचना देण्ग्नयात आली असून मार्गसूचीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सरकारने जिल्हा प्रशासनांना दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी दसऱयासंबंधीची मार्गसूची मंगळवारी प्रसिद्ध केली. सदर मार्गसूची 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत जारी असणार आहे. म्हैसूर वगळता राज्यातील इतर ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये 400 हून अधिक जण एकत्र जमू नयेत. तसेच उपस्थितांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे सक्तीने पालन होईल याकडे लक्ष द्यावे. दसरोत्सवामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता होणाऱया कार्यक्रमांवर बंदी असणार आहे. आवश्यकता असलेल्या भागात कठोर निर्बंध घालून त्यासंबंधी अगोदर जागृती करावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनांना देण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय निर्देश आणि राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गसूचीचे पालन करावे. स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, महापालिका, अग्निशमन दल आणि आरोग्य खात्याने दिलेल्या सुरक्षेसंबंधीच्या सूचनांचे सक्तीने पालन करावे. समाजातील शांतता, सौहार्दता आणि एकतेला धक्का पोहोचणार नाही, याची जबाबदारी प्रशासनांनी घ्यावी, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
ऐतिहासिक म्हैसूर दसरोत्सवासंबंधी देखील मार्गसूची जारी करण्यात आली आहे. म्हैसूर राजवाडा आवारातील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझिंगची सक्ती करण्यात आली आहे. कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी म्हैसूरमधील कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी दृष्य संवहन माध्यमाची व्यवस्था करावी, असे मार्गसूचीत नमूद करण्यात आले आहे.
म्हैसूर दसरोत्सवासाठीही नियमावली
7 ऑक्टोबर रोजी चामुंडी टेकडीवर म्हैसूर दसरोत्सव उद्घाटन कार्यक्रम होणार असून या दिवशी 100 जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. तर राजवाडा आवारात 7 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱया सायंकाळच्या कालावधीत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम 2 तासांपेक्षा अधिक वेळेचे असू नयेत, आणि 500 पेक्षा अधिक जणांची उपस्थिती असू नये. दसरोत्सव कालावधीत मास्कच्या वापरावर लक्ष ठेवणे, गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांनी वेळोवेळी देखरेख ठेवावी. जम्बो सवारी, मशाल मिरवणूक या कार्यक्रमांमध्ये देखील 500 पेक्षा अधिक जणांची उपस्थिती असू नये. या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱयांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आणि लसीचा किमान एक डोस घेतलेला असणे बंधनकारक आहे, असेही मार्गसूचीमध्ये नमूद करण्यात आले आहे.