पावसाने बागा उद्ध्वस्त झाल्याने फुलांचे दर वाढले, दसरा दिवाळीत फुलांचा तुटवडा जाणवणार
वार्ताहर/ कराड
सातारा, सांगलीसह कोल्हापूर जिल्हय़ात झालेल्या मुसळधार पावसाने फुलांच्या बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामी ऐन नवरात्र उत्सवात फुलांची आवक घटल्याने फुलांचे दर कडाडले आहे. कराडला दसऱयाच्या आठ दिवस आधीच झेंडूचा दर सव्वाशे रूपये प्रति किलोवर पोहोचला आहे. कर्नाटकहून झेंडूची आवक न झाल्यास दसरा व दिवाळीत झेंडूचा तुटवडा जाणवणार असून आणखी दर वाढण्याचा आंदाज व्यक्त होत आहे.
परतीचा पाऊस व चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीने सातारा, सांगलीसह कोल्हापूर जिल्हय़ातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सातारा जिल्हय़ात तर शेतातील उभ्या हायब्रीडची कणसे उगवली आहेत. भुईमूग उगवला आहे. तर सोयाबीन, ऊस आदी पिकांचही मोठे नुकसान झाले आहे. पेरलेला शाळू वाहून गेल्याने शेतकऱयांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. या पावसाचा फुलांच्या बागांना मोठा फटका बसला आहे. दसरा व दिवाळीच्या पूजेला झेंडूच्या फुलांना महत्व असल्याने शेतकरी दिवाळी व दसऱयाला फुले विकता यावीत, यासाठी बागा लावत असतात. मात्र दसरा व दिवळीच्या तोंडावर हाताला आलेल्या बागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
सध्या बाजारात झेंडू सव्वाशे रूपये प्रति किलो दराने विकला जात आहे. तर निशिगंध 250 रूपये, शेवंती 320 रूपये, व आस्टरचा दर 350 रूपये प्रति किलो झाला आहे. यावर्षी गणेशोत्सवाप्रमाणेच ऐन नवरात्र उत्सवात फुलांचा तुटवडा जाणवत आहे. तर दसरा व दिवाळीलाही फुलांचा तुटवडा जाणवणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. फुलांची आवक घटल्याने आणखी दर वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.