पंतप्रधान मोदींचा तालिबानला संदेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुजरातमधील सोमनाथ मंदिराशी संबंधित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हर्च्युअल सहभाग घेतला. यादरम्यान पंतप्रधानांनी दहशतवादामुळे विश्वास चिरडला जाऊ शकत नाही. ज्यांनी दहशतीच्या आधारावर साम्राज्य उभे केले त्यांचे अस्तित्व कायम राहत नाही, असा इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे विधान अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या हालचालीशी जोडले जात असून तालिबानला थेट संदेश समजला जात आहे.
दहशतवादामुळे विश्वास ठेचला जाऊ शकत नाही. सोमनाथ मंदिर अनेकवेळा पाडण्यात आले, त्याला लक्ष्य करण्यात आले. पण प्रत्येकवेळी हे मंदिर उभे राहते आणि ते जगासाठी सर्वात मोठे उदाहरण आहे, असे पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले. जे शक्तींचा नाश करत आहेत, जे दहशतवादाच्या आधारावर साम्राज्य उभारण्याचा विचार करत आहेत, ते काही काळ वर्चस्व गाजवू शकतात, परंतु त्यांचे अस्तित्व कधीही कायमचे नसते, ते अधिक दिवसांसाठी दडपू शकत नाहीत, असे मोदी पुढे म्हणाले. याप्रसंगी पंतप्रधानांनी सोमनाथ मंदिराशी संबंधित विविध विकास योजनांचे व्हर्च्युअल प्रणालीद्वारे उद्घाटन केले.
सोमनाथ मंदिर प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी 83 कोटी रुपये निधीच्या माध्यमातून पहिल्या ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिराच्या चार प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि मुख्य मंदिराजवळ 30 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱया पार्वतीजी मंदिराची पायाभरणीही केली. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लालकृष्ण अडवाणीही ऑनलाईन सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींनी ‘जय सोमनाथ’च्या घोषाने प्रक्षेपण कार्यक्रमाची सुरुवात केली. आज जरी मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने जोडलो असलो, तरी मी स्वतःला भगवान सोमनाथच्या चरणी जाणवत आहे. हे माझे भाग्य आहे. या पवित्र स्थानी आज मला सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो’ असे मोदी म्हणाले.
अफगाणमधील स्थितीवर भारताची नजर
भारत सध्या अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे आणि त्याचे संपूर्ण लक्ष तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यावर आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानवर तालिबानचे राज्य आल्यानंतर भारताने आपल्या दुतावासातून लोकांना बाहेर काढले आहे. आता तेथे अडकलेल्या भारतीयांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत सतत अमेरिकेच्या संपर्कात आहे, ज्याने आता काबूल विमानतळाचा ताबा घेतला आहे.
भारताची ‘वेट अँड वॉच’ भूमिका
अफगाणिस्तानमधील तालिबानच्या स्थितीसंबंधी भारत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. तथापि, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीच्या बैठकीत काही देशांना दहशतवादाविरोधात सुरू असलेली लढाई कमकुवत करायची आहे, त्यामुळे जगाने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी तालिबान आणि पाकिस्तानचे नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवला होता.