अल्ताफचा मानवी ढालच्या स्वरुपात केला वापर
वृत्तसंस्था/ श्रीनगर
श्रीनगरच्या हैदरपुरा चकमकप्रकरणी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर याप्रकरणी तपास करणाऱया एसआयटीने सुरक्षा दलांना क्लीनचिट दिली आहे. गोळीबारात मारले गेलेला व्यावसायिक अल्ताफ अहमद बटचा पाकिस्तानी दहशतवाद्याने मानवी ढालच्या स्वरुपात वापर केला होता असे एसआयटीचे म्हणणे आहे. तर चकमकीदरम्यान एका नागरिकाला दहशतवाद्याने मारले होते. स्थानिक दहशतवाद्याच्या गोळीबारात नागरिकाला जीव गमवावा लागल्याचा दावा एसआयटीने केला आहे.
पाकिस्तानी दहशतवादी बिलाल भाई उर्फ हैदरने अल्ताफचा मानवी ढाल म्हणून वापर केला. चकमकीत पाकिस्तानी दहशतवाद्यासह अल्ताफचा देखील मृत्यू झाला होता असे चकमकीची चौकशी करणाऱया एसआयटीचे प्रमुख पोलीस उपमहानिरीक्षक सुजीत कुमार यांनी सांगितले.
चकमकीत अल्ताफ (48 वर्षे)सह डॉक्टर मुदसिर गुल (43 वर्षे) आणि आमिर मागरे याचाही गोळी लागल्याने मृत्यू झाला होता. मारले गेलेले लोक दहशतवाद्यांसाठी ओव्हरग्राउंड वर्कर्स होते असा पोलिसांचा दावा होता. तर सुरक्षा दलांनी या लोकांचा मानवी ढाल म्हणून वापर केल्याचा आरोप मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांनी केला होता.
या चकमकीनंतर पोलिसांनी हैदरपुरापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर हंदवाडात कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत सर्व मृतदेह दफन केले होते. परंतु सातत्याने होत असलेल्या निदर्शनांनंतर अल्ताफ आणि गुल यांचे मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आले होते.
पाकिस्तानी दहशतवादी बिलालने घराच्या मालकाला मानवी ढाल केले, बिलालनेच डॉक्टर मुदसिर यांना मारले होते. डॉक्टर गुल हे स्वतःच्या वाहनात दहशतवाद्यासोबत गेले होते. याचबरोबर दहशतवादी अनेकदा त्यांच्या कार्यालयात थांबत होता असे सीसीटीव्हीमधून स्पष्ट झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱयाने दिली आहे.
आमिर दहशतवाद्याचा निकटवर्तीय
गोळीबारात मारले गेलेला तिसरा व्यक्ती आमिर सातत्याने बांदीपुरा येथे जात होता. तो दहशतवादी बिलालचा निकटवर्तीय होता आणि चकमकस्थळावरून फरार होण्यादरम्यान गोळीबाराच्या तावडीत सापडून त्याचा जीव गेल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षकांनी दिली आहे. अल्ताफ बटचे कुटुंब इमारतीत राहणाऱया भाडेकरूंसंबंधी समाधानकारक माहिती देऊ शकले नसल्याचे एसआयटीचे म्हणणे आहे. अल्ताफ हेच पूर्ण मालमत्तेचे मालक होते, अशा स्थितीत भाडेकरार आणि अन्य गोष्टी केवळ त्यांनाच माहिती होत्या असा दावा अल्ताफ यांची पुतणी साइमाने केला आहे.
गुपकारचा आरोप
हैदरपुरा चकमकप्रकरणी पोलिसांच्या दाव्यावर गुपकार घोषणा आघाडीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पोलिसांचा दावा हा जुन्या कहाणीची पुनरावृत्ती असल्याचे म्हणत गुपकार आघाडीने न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.