वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
अफगाणिस्तानच्या इस्लामिक राजवटीत राहण्यासाठी गेलेल्या इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांच्या पत्नींना देशात परत घेण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. सोनिया सबॅस्टियन उर्फ आएशा, मेरिन जेकब उर्फ मेरिन, निमिषा नायर उर्फ फातिमा इसा आणि रफीला या महिला 2016-18 या कालावधीत अफगाणिस्तानातील खुरासन प्रांतात राहण्यासाठी गेल्या होत्या. विविध हल्ल्यांमध्ये या महिलांचे पती मारले गेले आहेत. या महिलांनी 2019 मध्ये अफगाणिस्तानच्या प्रशासनासमोर शरणागती पत्करली होती.
भारतातून पळून जात इस्लामिक स्टेटमध्ये सामील होणाऱया चार महिलांबद्दल मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने दहशतवादी संघटनेत सामील महिलांना देशात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. या चारही महिला केरळच्या रहिवासी होत्या आणि सध्या अफगाणिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत.
विदेश मंत्रालयाचे अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणांच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱयांसमवेत अनेक भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या महिलांची चौकशी केली आहे. या चौकशीत धर्मांतरानंतर या महिला अत्यंत कट्टरपंथी झाल्याचे आढळून आले आहे. या महिला केरळमध्ये परतणे राज्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते असे सुरक्षा यंत्रणांचे मानणे आहे.
केरळच्या या चारही महिलांनी इस्लामिक स्टेटमध्ये प्रवेश केला होता. इस्लामिक स्टेटने 2016 च्या सुमारास जगभरातील मुस्लिमांना दहशतवादी संघटनेत सामील होण्याचे आवाहन केले होते. भारतातूनही काही लोक अफगाणिस्तान आणि सीरियात पोहोचले होते. या चारही महिलांचे पती विविध घटनांमध्ये मारले गेले आहेत. या महिला इस्लामिक स्टेटच्या वतीने दहशतवादी कृत्यात सामील होत्या.