काश्मीरमधील घटनेनंतर सर्वसामान्यांमध्ये संताप
श्रीनगर / वृत्तसंस्था
काश्मीरमध्ये बुधवारी दिवसभरात तीन ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले केले. यात तीन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसात आतापर्यंत श्रीनगरमध्ये पाच-सहावेळा दहशतवादी हल्ले झाले आहेत. पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यामागे असलेल्या संघटनेचा उलगडा अद्याप झाला नसला तरी रेजिस्टेन्स प्रंट नावाच्या दहशतवादी संघटनेने हल्ल्यांची जवाबदारी स्विकारल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या संघटनेत हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-एöतोयबाचे दहशतवादी सामील आहेत. पोलीस याबाबत पुढील चौकशी करत आहेत.
हल्ले झाल्यानंतर लगेचच सुरक्षा जवानांच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांना शोधण्याचे काम हाती घेतले आहे. या हल्ल्यांमध्ये स्थानिक नागरिक हेच दहशतवाद्यांचे लक्ष्य होते, अशी माहितीही पोलिसांना मिळाली आहे. या तीन हल्ल्याच्या घटनांनंतर या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जम्मू पोलीसही अधिक सक्रिय झाले असून परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विशेषतः श्रीनगर आणि बांदिपोरा भागात मोठय़ा संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
काश्मिरी पंडितांचा हल्ल्यात बळी
मृतांमध्ये काश्मिरी पंडित माखन लाल बिंद्रू, वीरेंद्र पासवान आणि मोहम्मद शफी यांचा समावेश आहे. माखन लाल बिंद्रू हे 70 वर्षाचे होते. बिंद्रू यांचा औषध विक्रीचा व्यवसाय होता. 90 च्या दशकात दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांना त्रास देण्यास सुरूवात केली आणि काश्मीरमधून अनेक पंडितांनी पलायन केले होते. तेव्हाही बिंद्रू यांनी काश्मीर सोडले नव्हते. हल्ल्यात ठार झालेला विरेंद्र पासवान हा फेरीवाला असून तो मूळचा बिहारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर मोहम्मद शफी हा बांदिपोरा येथील हाजीन भागात राहत होता. त्याचा रुग्णालयात उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला.
हल्ल्यांचा तीव्र निषेध
या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक भागातून निषेध व्यक्त केला जात आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांसाठी संवेदना व्यक्त केली आहे. मेहबुबा मुफ्ती यांनीदेखील या हत्येचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा या परिसरात सुरक्षा वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.