गुप्त माहितीच्या आधारावर भारतीय सेनेकडून अचूक हल्ले : सूत्रांची माहिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात दहशतवादी घुसविण्याच्या पाकच्या ‘नापाक’ प्रयत्नांना भारतीय सेनेने पाकव्याप्त काश्मीरात हल्ले करून सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करून ते नष्ट करण्यात येत आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक पाक दहशतवादी आणि पाक सैनिकांचा खात्मा झाला आहे. केंद्र सरकारच्या विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे.
2019 मध्ये पाकने सीमा सुरक्षा दलाच्या बसवर केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकच्या सीमारेषेत घुसून बालाकोट येथे विमान हल्ले केले होते. त्या वायुहल्ल्यामंध्ये किमान 50 दहशतवादी व त्यांचे प्रशिक्षक मारले गेले होते. त्यानंतर आता पुन्हा भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य बनविले आहे. हे हल्ले अद्यापही सुरूच असून दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्याचा सपाटा भारतीय सेनेने लावला आहे.
गुप्तचरांच्या माहितीच्या आधारावर
पाकव्याप्त काश्मीरमधील भारताच्या गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर भारतीय सेनेने नेमक्या स्थानांवर अचूक हल्ले चढविले आहेत. यासाठी उखळी तोफा, अत्याधुनिक रायफली तसेच अग्निबाण आदी शस्त्रांचा उपयोग करण्यात येत आहे. या लक्ष्यवेधी हल्ल्यांमध्ये पाक सैनिक आणि दहशतवादी यांची मोठी जिवीत हानी झाली असून त्या तुलनेत भारताची हानी अत्यल्प आहे. विश्वासार्ह गुप्तचर माहितीच्या आधारावर हे हल्ले करण्यात येत असल्याने ते अचूक आणि विनाशकारी ठरत आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
पाकचा बचाव भेदला
बालाकोट येथील वायुहल्ल्यामुळे पाकने त्याच्या दहशतवादी तळांना अधिक सुरक्षा दिली आहे. पाक विमाने या तळांना आकाशातून संरक्षण देत असतात. तरीही भारतीय सैनिकांनी अशा तळांवर नेमके हल्ले करून दहशतवाद्यांची अनेक सुरक्षित स्थाने नष्ट केली आहेत. अनेक स्थानांवरून दहशतवादी व त्यांना संरक्षण देणाऱया पाक सैनिकांनी पळ काढल्याचे दिसून येत आहे.
भारताच्या भूमिकेत परिवर्तन
गेल्या सात वर्षांपर्यंत भारत केवळ पाकच्या आगळीकींना जेवढय़ास तेवढे प्रत्युत्तर देण्यात समाधान मानत होता. तथापि गेल्या काही वर्षांपासून या धोरणात अमूलाग्र परिवर्तन झाले. आता पाकच्या कोणत्याही कुरापतीला आक्रमकपणे आणि पाकची जास्तीत जास्त हानी होईल अशा प्रकारे प्रत्युत्तर दिले जात आहे.
स्थानिकांना भडकाविण्याचा प्रयत्न
काश्मीरमधील स्थानिक युवकांची माथी भडकावून पाकिस्तान अशांतता माजवू पहात आहे. तसेच कडक हिंवाळा सुरू होऊन हिमामुळे वाटा बंद होण्यापूर्वीच जास्तीत जास्त दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याची पाक सेनेची धडपड आहे. दरवर्षीच नोव्हेंबरमध्ये पाककडून असे प्रयत्न केले जातात. तथापि, यंदा या प्रयत्नांचा तीव्रपणा जास्त आहे. परिणामी भारताकडूनही अतिशय आक्रमक प्रत्युत्तर दिले जात असून दहशतवाद्यांच्या सर्व मनसुब्यांवर विरजण पडले आहे.
पाक आकडे लपवतोय…
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे अनेक तळ उडविण्यात आले असून तेथे वास्तव्यास असलेले असंख्य दहशतवादी ठार झाले आहेत. तथापि, मारले गेलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तान ‘नागरिक’ म्हणून संबोधत आहे. अशाप्रकारे त्याच्याकडून आकडय़ांची लपवाछपवी पाककडून सुरू असून आंतरराष्ट्रीय सहानुभूती मिळविण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप भारतीय सेना सूत्रांनी केला.
वायुहल्ल्याची अफवा…
भारताने पाकवर बालाकोटसारखा वायुहल्ला पुन्हा केला आहे, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांवरून गुरुवारी संध्याकाळी प्रसारित करण्यात आले होते. मात्र, ती अफवा असल्याचे स्पष्टीकरण भारतीय सेनेकडून देण्यात आले. मात्र, भूमीवरूनच अचूक हल्ले करून दहशतवाद्यांचे खच्चीकरण केले जात असल्याचे, आणि या हल्ल्यांना यश येत असल्याचेही सेनासूत्रांनी प्रतिपादन केले.