युएनएचआरसीमध्ये भारताने दिले प्रत्युत्तर ख्रिश्चन, अहमदियांवरील हल्ल्यांचा उल्लेख
वृत्तसंस्था/ जिनिव्हा
संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेच्या 45 व्या अधिवेशनात भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत त्याचे तोंडच बंद केले आहे. पाकिस्तान दहशतवादाला पोसत असून त्याने 4 हजार दहशतवाद्यांची नावेच हटविली आहेत. पाकिस्तान अद्याप दहशतवाद्यांचे नंदनवन असल्याचे भारतीय प्रतिनिधी पवन बधे यांनी सुनावले आहे.
काश्मिरी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तान लाँचपॅड चालवत आहे. जग महामारीला तोंड देत असताना पाकने 4 हजार दहशतवाद्यांची नावे यादीतून हटविली असल्याचे भारताने म्हटले आहे.
पीओकेत प्रचंड घुसखोरी
पाकमध्ये अहमदिया समुदायाच्या लोकांचा सर्वाधिक छळ केला जात आहे. पाकिस्तानात दरवर्षी हजारोंच्या संख्येत ख्रिश्चन समुदायाच्या लोकांचा छळ केला जातो आणि यातील बहुतांश जणांची हत्या घडवून आणली जाते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या अन्य प्रांतातील लोकांना आणून वसविण्यात आले आहे. पीओकेत प्रत्येकी 4 पैकी 3 जण अन्य प्रांतातील असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तान कोंडीत
एफएटीएफमध्ये पाकिस्तानच्या भवितव्यावर ऑक्टोबर महिन्यात निर्णय होणार आहे. पाकिस्तान सध्या ग्रे लिस्टमध्ये आहे. दहशतवाद विरोधातील आश्वासनांची पूर्तता करण्यास पाकिस्तानला अपयश आल्यास त्याला पुढील महिन्यात काळय़ा यादीत समाविष्ट केले जाऊ शकते. पाकिस्तानचा काळय़ा यादीत समावेश झाल्यास त्याच्या अडचणी अधिकच वाढणार आहेत. आर्थिक हलाखीला तोंड देणाऱया पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडून पडू शकते.