नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोणत्याही कारणास्तव दहशवाद पोसणाऱया देशांसंबंधी मवाळ भूमिका न घेता त्यांना लक्षात राहील असा धडा शिकविण्यात ब्रिक्स परिषदेच्या सदस्य देशांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते या संघटनेच्या परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करीत होते. संयुक्त राष्ट्र संघाची रचना व कार्यपद्धतीमध्ये सुधारणा आवश्यक असून सुरक्षा परिषदेचा विस्तार झाला पाहिजे, अशीही भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
ब्रिक्सचे अध्यक्षपद यंदा रशियाकडे आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची त्यांनी प्रशंसा केली. मात्र, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा उल्लेखही केला नाही. सध्या पूर्व लडाखच्या सीमेवर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी चीनला महत्त्व न देण्याचे धोरण अवलंबलेले दिसते, असे मतप्रदर्शन अनेक जागतिक तज्ञांनी केले आहे.
जागतिक संस्था संकटात
संयुक्त राष्ट्र संघ स्थापित आणि जगाच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवणाऱया इतरही संस्थांची विश्वासार्हता आज धोक्यात आली आहे. या संस्था 75 वर्षे जुन्या असून नव्या जगाच्या आवश्यकतांशी जुळवून घेण्यात त्यांना अपयश येत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या संस्थांच्या रचनेत व कार्यपद्धतीत सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार होणे आवश्यक आहे, असे मुद्दे त्यांनी आग्रहीपणे मांडले. जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक आरोग्य संघटना अशा संस्थांच्या कार्यपद्धतीतही सुधारणा होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले.
विश्वशांततेत भारत आघाडीवर
संयुक्त राष्ट्रसंघाचा 75 वा स्थापनादिन नुकताच पार पडला. या संघटनेच्या मूल्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. तसेच या संस्थेचा सदस्य या नात्याने भारत बहुविधतावादाचे समर्थन करतो. संपूर्ण विश्वाला एक परिवार मानणारी आमची भारतीय संस्कृती आहे. याच आधारावर आम्ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या धोरणांचे समर्थन करतो आहोत. जगात होणारे सशस्त्र संघर्ष मिटविण्यासाठी सर्वाधिक संख्येने भारतीय सैनिकांनी बलिदान दिले आहे, हा मुद्दाही जागतिक शांततेच्या संदर्भात त्यांनी आजर्वून अधोरेखित केला.
परस्पर व्यापारवृद्धीला संधी
ब्रिक्स देशांमध्ये परस्पर व्यापार वाढविण्यासाठी मोठी संधी आहे. कोरोनामुळे जगाचीच अर्थव्यवस्था मंदावलेली आहे. तिची स्थिती सुधारण्यासाठी ब्रिक्स ही संघटना महत्त्वाचे कार्य करू शकते. भारताने आत्मनिर्भरता मोहिमेअंतर्गत मोठा आर्थिक सुधारणा कार्यक्रम हाती घेतला आहे. कोरोना काळात भारतीय औषध उद्योगाने 50 हून अधिक देशांना औषधे पाठविली आहेत. लस उत्पादन आणि तिचे वितरण मोठय़ा प्रमाणात करण्याची आमची क्षमता जगाला उपयुक्त ठरणारी आहे, असेही ठाम प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले. सध्याच्या कठीण परिस्थितीत ब्रिक्सचे नेतृत्व रशियाकडे येत आहे. या देशाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे उत्तरदायित्व यशस्वीरित्या सांभाळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.