अध्याय आठवा
अजगराच्या जबडय़ातून वारा जरी आत गेला तरी तो ते भक्षण करतो. तसेच योग्याने वारा पिऊन राहण्याची तयारी ठेवावी. अजगराला अनेक दिवस आहार मिळाला नाही तरी तो एका जागी स्वस्थ पडून असतो. त्याप्रमाणे योग्याने दीर्घ आसन करून निदेशिवाय निजसुखाच्या तंद्रीत रहावे.
अजगराप्रमाणे योग्याचे शरीर सामर्थ्य अफाट असते, बुद्धी तीव्र असते, इंद्रियबलही अलौकिक असते पण आहाराचा विचारही त्याच्या मनात येत नाही, तो आपला आत्मानंदात निमग्न असतो. आता अवधूत त्यांच्या पुढील गुरु समुद्र याबद्दल सांगत आहेत. ते म्हणाले, ‘समुद्रामध्ये गंभीरपणा, परिपूर्णता, निर्मळपणा हे गुण असतात. योग्याने हे गुण अंगी बाणवावेत. समुद्र हा सदोदित सुप्रसन्न असतो. त्याप्रमाणे योग्यानेही नेहमी प्रसन्न रहावे. आत्मज्ञानाने तो धुसफूस करायचे विसरून गेलेला असतो.
समुद्राच्या आतील भागातले पाणी शांत आणि गंभीर असते. योग्यानेही नेहमीच शांत आणि गंभीर राहावे. समुद्र कधी मर्यादा ओलांडत नाही तसेच योग्याने कधी गुरु आज्ञेचे उल्लंघन करू नये. अनेक नद्यांचे गढूळ जल जरी समुद्राला येऊन मिळाले तरी तो गढूळ न होता सर्वकाळ निर्मळ राहतो. त्याचप्रमाणे योग्यानेही अनेक प्रकारची कर्मे करून अंतःकरण सदैव शुद्ध ठेवावे. समुद्र अथांग पसरलेला असल्याने त्याचा थांग कुणालाही लागत नाही त्याप्रमाणे योगीही परमज्ञानी असल्याने त्याचा थांग वेद शास्त्रांनाही लागत नाही.
समुद्राला भरती ओहोटी असते पण योग्याने कधी क्षुब्ध न होता नेहमी योगबळाने शांत असावे. समुद्र सर्वत्र खारट असतो तसे योग्याने न राहता सर्व जीवांना मधुर बोध करत रहावा. समुद्रावर पाऊस पडल्यास ते पाणी वाया जाते पण योगी जे सेवन करतो ते कधीच वाया जात नाही. योग्याकडून थोडासा जरी बोध मुमुक्षुला मिळाला तरी त्यामुळे त्याची भव व्यथा कमी होते म्हणून मुमुक्षुनी नेहमीच भगवद्भक्तांना भजावे. समुद्रात येण्याची व जाण्याची विद्या ज्याला अवगत असते तो समुद्रात अंघोळ करू शकतो. तसेच योग्यावर ज्याची श्रद्धा असते त्यालाच त्याची कृपा मिळते. मोठा धनवंत झाला तरी कोणत्याच उपायांनी त्याला समुद्राचे उल्लंघन करवत नाही त्याप्रमाणे देव, राजे, मनुष्य किंवा किन्नर यानाही योगीश्वराचे उल्लंघन करवत नाही. समुद्रात घाण राहू शकत नाही. लाटा ती किनाऱयावर फेकून देतात. तसेच योग्याच्या मनातही ध्यानामुळे थोडीही मलिनता रहात नाही. ताम्रपर्णी नदी समुद्राला येऊन मिळताच मोत्याची खाण होते तसेच श्रद्धा योग्याला येऊन मिळताच मुमुक्षुना ती मुक्तीची खाणच होते. समुद्राचे पाणी कधी आटत नाही त्याप्रमाणे योग्यालाही जन्ममरण नसते कारण समुद्राप्रमाणे तोही परिपूर्ण
असतो.
जो समुद्रामध्ये उडी मारतो त्याच्या हाताला नानाप्रकारची रत्ने लागतात. त्याप्रमाणे योग्याशी जो समरस होतो त्याच्यावर ज्ञानरत्नांचा वर्षाव होतो. ज्याप्रमाणे समुद्राची मर्यादा कधी कोणाला करवत नाही, त्याचप्रमाणे योग्याची मर्यादाही वेदांना व शास्त्रांना करवत नाही. समुद्राचे पाणी ज्याप्रमाणे प्रवाहरहित-निश्चळ असते, त्याचप्रमाणे योगी हाही मृत्युभयरहित, केवळ निश्चळ होऊन राहिलेला असतो.
समुद्राला केव्हाही प्रवाह म्हणून नाही, तो सदोदित जशाच्या तसाच परिपूर्ण; तसेच योग्यासही जन्ममरण नाही. तो सर्वकाळ परिपूर्णच असतो. पावसाळय़ात अपरंपार जल घेऊन नद्या आल्याने समुद्राची पातळी वाढत नाही की ग्रीष्म ऋतूत नद्या सुकल्याने समुद्राची पातळी उतरत नाही हे लक्षात घेऊन योग्यानेही नाना प्रकारचे ऐश्वर्य चालून आले तरी त्याचा त्याने थोडाही गर्व करू
नये.
भगवत्परायण मुनीसुद्धा समृद्धीने युक्त असला तरी आनंदाने हुरळून जात नाही आणि दारिद्रय़ असले तरी दुःखी होत नाही. येथे अवधुतानी समुद्राला गुरु करताना त्याचे गुण आणि दोष दोन्ही लक्षात घेतले व त्यापासून योग्याने कोणकोणता बोध घ्यावा इत्यादी गोष्टी सविस्तर विवरण करून सांगितल्या.