कोरोना महामारी पार्श्वभूमीच्या निकालात जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण, : विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आनंदी आनंद
प्रतिनिधी /पणजी
दहावीची परीक्षा न घेता निकाल जाहीर करण्याचे आव्हान गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळासमोर होते. प्रत्येक शाळांनी निकाल तयार करण्यास मदत केली आणि मंडळाच्या इतिहासातील सर्वात जास्त म्हणजे 99.72 टक्के निकाल लागला, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शटये यांनी काल सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यंदाच्या वर्षी 23 हजार 967 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. पैकी 23 हजार 900 विद्यार्थी पास झाले. फक्त 67 विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यात तिसावाडी तालुक्यात 16, सासष्टीत 13, बार्देशमध्ये 12, केपेत 11, मुरगांव 4, फोंडा 4, डिचोली 3, सत्तरीत 2, काणकोण आणि पेडण्यात प्रत्येकी 1 विद्यार्थी नापास झाले. सांगे व धारबांदोडा या दोन तालुक्यात एकही विद्यार्थी नापास झाला नाही. त्यांना 100 टक्के निकालाचा मान मिळाला.
राज्यात फक्त दोन मुली नापास
यंदाच्या वर्षी 23 हजार 967 विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता पैकी 10 हजार 956 मुली होत्या. त्यातील 10 हजार 954 मुली उत्तीर्ण झाल्या तर फक्त 2 मुली नापास झाल्या. 13 हजार 11 मुलगे होते, त्यातील 12 हजार 946 पास झाले. पास क्लासमध्ये 2 हजार 231, दुसऱया वर्गात 46 ते 59 टक्के गुण मिळवलेले 7001 विद्यार्थी, पहिल्या वर्गात 60 ते 80 टक्के गुण घेणारे 10 हजार 276 तर 81 ते 100 टक्के गुण मिळवणाऱयांमध्ये 4 हजार 392 विद्यार्थी आहेत.
विशिष्ट निकषांवर देण्यात आले गुण
परीक्षा न देता विद्यार्थ्यांना गुण कसे द्यावेत यासाठी निकष तयार केले होते. त्यात नववीचे 10 गुण, प्रिलीमचे 20 गुण, फॉर्मेटिव्ह 1 चे 25 व फॉर्मेटिव्ह 2 चे 25 गुण मिळून 80 गुणापैकी गुण देण्यात आले. 20 टक्के गुण शाळांनी त्यापूर्वी पाठवून दिले होते. अशा पद्धतीने तयार करण्यात आला निकाल.
नापास झालेल्यांना द्यावी लागणार परीक्षा
गेल्यावर्षी एटीकेटी मिळालेले 517 विद्यार्थी होते. यंदा 67 नापास झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी लेखी परीक्षा द्यावी लागेल. सदर परीक्षा घेण्याची जबाबदारी त्या त्या शाळांची असेल. परीक्षा घेण्यापूर्वी 10 दिवस आधी विद्यार्थ्यांना कल्पना दिली जाईल.
निकाल मान्य नसल्यास लेखी परीक्षा
ज्या विद्यार्थ्यांना अधिक गुण हवे असतील किंवा त्यांना हा निकाल मान्य नसेल तर त्यांना लेखी परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. नापास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 11 वीला प्रवेश दिला जाईल आणि ए.टी.केटी जाहीर करुन त्यांना लेखी परीक्षेची संधी दिली जाईल, असे शेटय़े यांनी सांगितले.
सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार अकरावीत प्रवेश… पण?
ज्यांना 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे त्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. त्यासाठी 6744 अर्ज आल्याचे त्यांनी सांगितले. यंदा 99.72 टक्के निकाल लागला. नापास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 11 वीत प्रवेश दिला जाईल, पण उच्च माध्यमिक विद्यालयात एवढय़ा जागा आहेत का? या विषयावर विचारणा केली असता वर्ग ऑनलाईन घेतले जात आहेत. त्यामुळे प्रवेश मिळाला नाही असा एकही विद्यार्थी असणार नाही, असे त्यांनी सांगितले.