नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल २० जुलैला जाहीर करणार असल्याची घोषणा सीबीएसई बोर्डाने केली आहे. तर बारावीच्या परिक्षेचा निकाल ३१ जुलै रोजी लागणार आहे. तसेच आजच सीबीएसईने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठीचे नवीन सूत्र जाहीर केले आहे.
दहावीचा निकाल २० जुलैला आणि बारावीचा निकाल ३१ जुलैला लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जेणेकरुन ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी जायचं आहे, त्यांना काही अडचणी येणार नाहीत यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सीबीएसई बोर्डाचे संयम भारद्वाज यांनी सांगितले.
सीबीएसई बोर्डाने आजच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केला. यासाठी तीन प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. इयत्ता १०वी मध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर ३० टक्के मार्क देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर ३० टक्के गुण असतील ते ११ वीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित आणि उरलेले ४० टक्के गुण हे बारावी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि प्रिलियम परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येणार आहेत.