कुद्रेमनी हायस्कूलमध्ये शाळा सुधारणा मंडळ-पालक वर्गाच्या बैठकीत मागणी
वार्ताहर/ कुद्रेमनी
दहावीच्या वार्षिक परीक्षेसंदर्भात दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या कुद्रेमनी हायस्कूलमध्ये शाळा सुधारणा मंडळ व पालक वर्गाची बैठक नुकतीच झाली. विद्यार्थ्यांची परीक्षा शाळेतच घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी पालक वर्गातून करण्यात आली.
मुख्याध्यापक पी. एच. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सीमेवरील हे गाव सध्या कोरोनामुक्त आहे. शाळेत परीक्षा झाली तर विद्यार्थ्यांना सुरक्षेच्यादृष्टीने सोयीचे ठरेल. पण उचगाव किंवा बेकिनकेरे येथील परीक्षा केंद्रात परीक्षा झाली तर या भागात कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुद्रेमनीच्या विद्यार्थ्यांना शिनोळी, बाची गावावरून पुढे जावे लागते. मात्र या ठिकाणी सीमा हद्द असल्याने पुढे कसे जाता येणार? टेम्पो सोडणार नाहीत किंवा सर्वच विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी स्वतःची वाहने आहेतच असेही नाही. सोनोली, बेळगुंदी गावावरून जायचे झाल्यास मध्ये नदी आहे. मोठा पाऊस झाला तर ऐनवेळी मध्येच अडकण्याची शक्यताही आहे. या सर्व अडचणींचा विचार केला तर शाळेतच परीक्षा घेणे सोयीचे ठरेल. यासाठी आमदार खासदारांना निवेदन देण्याविषयी यावेळी चर्चा झाली.
परिसरातील मराठी व कन्नड प्राथमिक शाळांच्या खोल्यांमध्ये परगावाहून आलेल्या नागरिकांना ठेवण्यात आले होते. तपासणी करून सर्वांना घरी पाठवून ग्राम पंचायतीच्यावतीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. सध्या शाळेत परीक्षेसंदर्भात विषयांचे उजळणी वर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
बैठकीत बोलताना शाळा सुधारणा मंडळाचे अध्यक्ष ईश्वर गुरव यांनी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची मानसिक तयारी करून घेणे गरजेचे आहे. शासनाच्या नियमानुसार परीक्षा होतील. पण गावच्या शाळेत परीक्षा झाली तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हिताचे होईल. आमचा गाव कोरोनामुक्त आहे. आजुबाजूच्या परिसरात कोरोनाचा संसर्ग आहे. मुलं एकत्र आली आणि कदाचित रोगाचा संसर्ग झाला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मंडळाचे सदस्य रवळू पाटील व गावडू पाटील यांचीही यावेळी र्मादर्शनपर भाषणे झाली. बैठकीस बहुसंख्य तालक उपस्थित होते.