ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेल्या दहावीच्या सामाजिक शास्त्रे पेपर-2 (भूगोल) व दिव्यांग कार्यशिक्षण या विषयांच्या परीक्षांना इतर विषयांच्या सरासरीनुसार गुण देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यासंदर्भातला निर्णय घेतला आहे. त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी याबाबतचे पत्रक काढून माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2020 मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने 23 मार्च रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत आयोजित करण्यात आलेली सामाजिक शास्त्रे पेपर-2 (भूगोल) या विषयाची लेखी परीक्षा आणि त्यानंतर आयोजित करण्यात आलेली दिव्यांग विद्यार्थांच्या कार्यशिक्षण या दोन विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आल्या.
रद्द करण्यात आलेल्या विषयांच्या गुणदानासंदर्भात शिक्षण मंडळाने पर्याय शोधला आहे. सामाजिक शास्त्रे पेपर-2(भूगोल) या विषयाचे गुणदान हे विद्यार्थ्यांने इतर विषयांच्या लेखी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून, त्याचे रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाचे गुणदान त्याने अऩ्य विषयांच्या लेखी,तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन/तत्सम परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून केले जाणार आहे.