मडगाव भाजप उपाध्यक्ष सुनील नाईक यांची प्रतिक्रिया : न्यायालयाचा निर्णय म्हणजे विरोधी पक्षनेत्यांना समज
प्रतिनिधी / मडगाव
मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय गृह मंत्रालयाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करूनच यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रलंबित असलेल्या परीक्षा घेण्यास जी अनुमती दिली आहे त्याचे मडगाव भाजप मंडळाचे उपाध्यक्ष सुनील नाईक यांनी स्वागत केले आहे. परीक्षा होणार की नाही होणार या द्विधा मनःस्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांचा जीव अखेरीस भांडय़ात पडला असल्याचे त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
संपूर्ण गोव्यातील शाळांच्या व्यवस्थापनांनी, त्यांच्या पालक-शिक्षक संघ समित्यांनी तसेच गोव्यातील मुख्याध्यापक संघटनेने राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरविण्यात आल्याप्रमाणे सर्वं मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करून घ्याव्यात म्हणून जाहीर पाठिंबा दिला होता. असे असताना सुद्धा परीक्षा घेण्यास विरोध करणाऱया विरोधकांना उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे तडाखा बसला आहे, असे नाईक यांनी म्हटले आहे.
न्यायालयाने दिलेला निर्णय म्हणजे विरोधी पक्षनेत्यांना दिलेली योग्य समज आहे. यापुढे प्रमोद सावंत सरकारला शिक्षणासंदर्भात त्यांनी उपदेश देऊ नयेत. कारण ते पूर्णपणे सक्षम आहे. विरोधी पक्षनेत्यांनी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या मनात निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणाची जाणीव न ठेवता उलटसुलट पत्रकार परिषदा घेऊन त्यांच्या मनात आणखी भय आणि संभ्रम निर्माण केला. अशावेळी विरोध करण्यापेक्षा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला असता, तर खूपच छान झाले असते, असे टीका करताना नाईक यांनी म्हटले आहे.