प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनामुळे शाळा विद्यालये बंद झाली आहेत. अशापरिस्थित 10 वीच्या विद्याथ्याचे काय हा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना सतावत होता. अखेर शासनाच्या मार्गदर्शनानंतर दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे परीक्षा न देता लागलेला हा पहिलाच निकाल ठरला असून कोकण विभागाचा सलग दहाव्या वर्षी राज्यात सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला आहे. रत्नागिरी जिल्हय़ाने 100 टक्के यश मिळवले आहे.
कोकण बोर्डात या परीक्षेसाठी एकूण 31 हजार 168 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती व सर्व विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यात 16 हजार 38 मुलांचा तर 15 हजार 130 मुलींचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातील 21 हजार 80 विद्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के लागला आहे. रत्नागिरी जिल्हय़ात 10 हजार 754 मुले तर 10 हजार 326 मुली हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या निकालात 1.23 टक्के वाढ झाली आहे. पुनपर्रीक्षार्थी विद्यार्थी निकाल 90.46 टक्के लागला आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातून 725 पैकी 668 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कोकणातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा-परीक्षांकडे गांभीर्याने पहावेः ऍड.पाटणे
कोकण बोर्ड 100 टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम आलेय. सातत्याने सर्वाधिक निकाल लावण्याची परंपरा कोकण बोर्डाने कायम राखली आहे. सातत्याने शिखरावर राहणे कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या सामूहिक प्रयत्नाचे हे यश आहे. यापुढे कोकणातील विध्यार्थ्यानी स्पर्धा-परीक्षेकडे गांभिर्याने पहावे.