मुंबई \ ऑनलाईन टीम
विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता असेल आणि तिच प्राथमिकता लक्षात घेऊन परीक्षांसंदर्भातील निर्णय लवकरच घेऊ, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. कोरोनाची गंभीर परिस्थिती न्यायालयासमोर मांडू, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
आज सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय घेऊ असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी दोन दिवसांत बैठक घेणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असं वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या.
यावेळी बोलताना वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला राज्य सरकारचं प्राधान्य असल्याचं नमूद केलं. सगळ्यांनाच माहिती आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची आपण चर्चा करत आहोत. त्याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होण्याची शक्यता आहे. कुटुंबात कोरोना पॉझिटिव्ह असेल, तर तिथल्या विद्यार्थ्यांची मानसिकता काय असेल हे समजून घेतलं पाहिजे. मुलं वर्षभरापासून या परीक्षेसाठी तयारी करत आहेत. विद्यार्थ्यांचं हित, त्यांचं शारिरीक आणि मानसिक आरोग्य बघूनच त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांमध्ये देखील संभ्रम आणि घबराटीचं वातावरण आहे”, असं त्या म्हणाल्या.