एकीकडे कोरोना महामारीशी झुंज देत घर चालविण्यासाठी प्रत्येकाची कसरत सुरू आहे. अशा परिस्थितीत शिक्षणसंस्था लुटमारीवर उतरल्या आहेत. ते सांगतील तितकी रक्कम मोजली नाही तर मुलांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही, अशी परिस्थिती आहे.
मुख्यमंत्री येडियुराप्पा, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या कोरोनामुक्त झाले आहेत. आठवडाभराच्या उपचारानंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. कर्नाटकातील कोरोनाबाधितांची संख्या मात्र झपाटय़ाने वाढते आहे. एकूण बाधितांची संख्या दोन लाखांच्या घरात पोहोचली आहे. आतापर्यंत 3,510 हून अधिक जण दगावले आहेत. 80 हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अतिवृष्टीमुळे 56 तालुक्मयातील 885 गावांना हानी पोहोचली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे 4 हजार कोटींची मागणी केली आहे.
80 हजार हेक्टर जमिनीतील पीक हानी झाली आहे. 3,500 कि.मी.हून अधिक रस्त्यांचे नुकसान झाले आहे. 3,000 घरांची पडझड झाली आहे. 550 हून अधिक पुलांचे नुकसान झाले आहे. 104 लहान-मोठय़ा तलावांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गृहमंत्री एस. आर. बोम्माई व महसूलमंत्री आर. अशोक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कर्नाटकातील सद्य परिस्थितीची माहिती देऊन 4 हजार कोटींच्या मदतीची मागणी केली आहे. नुकसानीची जी आकडेवारी केंद्र सरकारला दिली आहे ती प्राथमिक स्वरुपाची आहे. मलनाड, किनारपट्टीच्या भागात मोठी हानी झाली आहे. उत्तर कर्नाटकातही अनेक पूल पाण्याखाली आहेत. पावसाचा जोर ओसरल्यामुळे पुराचा धोका टळला असला तरी मागील वषीच्या पुराच्या जखमा अजूनही तशाच आहेत. एकीकडे कोरोना महामारीचा कहर तर दुसरीकडे अतिवृष्टी या दोन्ही संकटांचा सामना करताना सर्वसामान्य नागरिकांची त्रेधा उडत आहे.
दोन दिवसांपूर्वी दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनाच्या सावटाखाली तब्बल तीन महिने उशिरा परीक्षा झाल्या. प्राथमिक व प्रौढ शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी इच्छाशक्तीचे दर्शन घडवत परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करीत परीक्षेला विरोध झाला. मात्र, परीक्षा घेण्यावर सरकार ठाम होते. 70.80 टक्के निकाल लागला आहे. कर्नाटकातील दहा जिल्हे ‘ए’ श्रेणीत आले आहेत. सहा विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत. 8,11,050 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 5,82,316 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होणाऱयांमध्ये मुलींची टक्केवारी अधिक आहे. 77.74 टक्के मुली तर 66.41 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. आता कशीबशी दहावी पूर्ण झाली, महाविद्यालयीन शिक्षणाचे काय होणार हा प्रश्न उरतोच. काही महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्षाला कधी होणार, याची शाश्वती नसताना प्रक्रियेला सुरुवात केली आहे. भरमसाट फी व देणग्या आकारून प्रवेश दिला जात आहे.
विद्यार्थी व पालकांची चिंता वाढेल, अशी सध्याची स्थिती आहे. पालकांचे उत्पन्न कमी झाले आहे. कोरोना महामारीमुळे नोकरकपात केली जात आहे. अनेक कंपन्यांमध्ये पगारही जेमतेम मिळत आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा असा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे. एकीकडे कोरोना महामारीशी झुंज देत घर चालविण्यासाठी प्रत्येकाची कसरत सुरू आहे. अशा परिस्थितीत शिक्षण संस्था लुटमारीवर उतरल्या आहेत. ते सांगतील तितकी रक्कम मोजली नाही तर आपल्या मुलांना हव्या असलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पालकांना विचित्र परिस्थितीत वाटचाल करावी लागत आहे. राज्य सरकारने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून फी कमी करण्याचे सूचना केली होती. मात्र, शिक्षण संस्था त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत परिस्थितीचा लाभ उठवताना दिसत आहेत. अनेक शिक्षणसम्राट सत्ताधारी किंवा विरोधी पक्षात सक्रिय राजकारणात आहेत. सरकारचा एखादा आदेश सोयीस्करपणे कसा धुडकवायचा याचे कसबही त्यांना अवगत आहे. कोरोनाशी लढा देत कठीण परिस्थितीतही जीव वाचवत संसार कसा रेटायचा आणि पाल्यांच्या शिक्षणासाठी कशी आणि कुठून तरतूद करायची, या विवंचनेत पालकवर्ग अडकला आहे. पुढील महिन्यापासून महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. अनेक शिक्षणतज्ञांनी सरकारला तसा सल्लाही दिला आहे. आधी महाविद्यालये सुरू करा, नंतर माध्यमिक व प्राथमिक शाळा सुरू करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही.
संपूर्ण राज्य कोरोना महामारी, अतिवृष्टी यामुळे सरकारच्या महसुली उत्पन्नात तूट अशा परिस्थितीत वाटचाल करत असतानाच राजधानीत मंगळवारी रात्री समाजकंटकांनी धुडगूस घातला. पुलकेशीनगरचे काँग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांचे घर पेटविण्यात आले आहे. तीन पोलीस ठाणी, पाच घरांना आगी लावण्यात आल्या आहेत. 50 दुचाकी, पंधराहून अधिक चार चाकी आगीत भस्मसात झाल्या आहेत. समाजकंटकांच्या हल्ल्यात 75 हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राजधानी तणावाखाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-भाजपमध्ये कलगीतुराही सुरू झाला आहे. एसडीपीआय, केएफडी आदी संघटनांचा या धुडगुशीमागे हात असल्याचा आरोप केला जात आहे. मास्टरमाईंड मुज्जमिल पाशासह 150 जणांना अटक करण्यात आली आहे.
काडूगोंडनहळ्ळी, देवरजीवनहळ्ळी परिसर समाजकंटकांनी वेठीस धरला होता. आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांच्या नात्यातील एका तरुणाने फेसबुकवर प्रेषित महमद पैगंबर यांच्याबद्दल अवमानकारक पोस्ट टाकल्याचा ठपका ठेवत हा धुडगूस घालण्यात आला आहे. जर प्रेषितांचा अवमान झाला असता तर कायदेशीर मार्गाने अवमान करणाऱयाला अद्दल घडविता आली असती. कायदा हातात घेऊन संपूर्ण शहराला वेठीस धरण्याच्या कृत्यामागे पूर्वनियोजित कट असल्याचा संशय आहे. या घटनेत सुमारे 30 कोटींहून अधिक हानी झाली आहे. ही हानी दंगलखोरांची मालमत्ता जप्त करून वसूल करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे.