प्राथमिक-माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणातही दहावी परीक्षा यशस्वीपणे पार पडली आहे. आता. 13 जुलैपासून उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाला प्रारंभ होणार आहे. तर ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली.
शुक्रवारी सायंकाळी विधानसौधमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 25 जूनपासून सुरू झालेली दहावी परीक्षा पालक, विद्यार्थी, विविध खाती आणि जिल्हा प्रशासनांच्या सहकार्याने यशस्वी झाली आहे. सहा दिवसांच्या कालावधीत दररोज सरासरी 7.5 लाख विद्यार्थी परीक्षेला हजर झाले आहेत. कोरोनासारख्या अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत परीक्षा घेणे कठीण होते. मात्र, विद्यार्थ्यांचे हित आणि सुरक्षेला प्राधान्य देऊन परीक्षा यशस्वी केली आहे. ही परीक्षा घेऊन सरकारने इतिहास निर्माण केला आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
तीन आठवडय़ापूर्वी बारावी परीक्षेचा शेवटचा पेपर झाला आहे. त्यामुळे या परीक्षेचा निकाल जुलैच्या तिसऱया आठवडय़ात जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दहावी परीक्षेच्या मूल्यमापनाला 13 जुलैपासून प्रारंभ होणार असून ती 30 जुलैपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल, असे सुरेशकुमार यांनी सांगितले.