शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांची माहिती
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात दहावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडली आहे. मंगळवारपासून उत्तरपत्रिका, उत्तरांवर आक्षेप मागविणे तसेच इतर प्रक्रिया सुरू होतील. एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाला प्रारंभ करण्यात येईल तर मे महिन्याच्या दुसऱया आठवडय़ात निकाल प्रसिद्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. जूनच्या चौथ्या आठवडय़ात पुरवणी परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिली.
बेळगाव व बागलकोट जिल्हय़ांचा शैक्षणिक आढावा घेण्यासाठी विजापूरला आल्यानंतर ते बोलत होते. 28 मार्चपासून सुरू झालेली दहावी परीक्षा सुरळीतपणे पार पडली आहे. एका परीक्षा केंद्रात गैरप्रकार झाला आहे. याप्रकरणी एका विद्यार्थ्याला डिबार करण्यात आले आहे. प्रथमच परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांच्या हजेरीचे प्रमाण 98 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मात्र, रिपिटर्स आणि बहिस्थ विद्यार्थ्यांची परीक्षेवेळी गैरहजेरी अधिक होती. गणवेशाबाबत शाळांमध्ये कोणताही गोंधळ निर्माण झाला नाही.