आसनव्यवस्था लवकरच निश्चित होणार : गोव्याबाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांची वेगळी व्यवस्था
प्रतिनिधी / पणजी
दहावी परीक्षेसाठी असलेल्या उपकेंद्रांची संख्या वाढवण्यात आली असून सामाजिक अंतर पाळण्यासाठी याआधी 90 असलेली उपकेंद्रे आता सुमारे 168 करण्यात आली आहेत. मुख्य परीक्षा केंद्रे 28 असली तरी उपकेंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यांची आसनव्यवस्था लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. गोवा सीमेजवळील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगतच्या दहावी विद्यार्थ्यांना स्वतंत्र परीक्षा उपकेंद्र गोव्याच्या सीमेवर देण्यात येणार असून त्यांनी परीक्षेसाठी पास काढून गोव्यात येऊन परीक्षा द्यावी, असे सूचविण्यात आले आहे. काही कारणाने जर त्यांना परीक्षा चुकली तर त्यांच्यासाठी कालांतराने पुरवणी परीक्षा घेण्याचे गोवा बोर्डाने ठरविले आहे.
बोर्डाचे सचिव भगिरथ शेटय़े यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचे गोव्याबाहेर राहणारे विद्यार्थी 297 असून बारावीचे 110 आहेत. त्यांचा संपूर्ण तपशील बोर्डाने तयार केला असून तो सरकारला तसेच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना उच्च माध्यमिक शाळेच्या प्राचार्यांना पाठविण्यात आला आहे. त्यांना गोवा सीमा ओलांडण्यासाठी परीक्षेकरीता सूट मिळावी म्हणून सरकारला कळविण्यात आले असून मुख्यध्यापकांनी व प्राचार्यांनी त्यांना परीक्षेसाठी पास मिळवून द्यावेत असे सूचविले आहे.
पास काढण्याची जबाबदारी तिघांची
सीमा ओलांडण्यासाठी पास काढण्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थी, पालकांची व शाळा प्रमुखांची असून अनेकांनी पाससाठी अर्ज करण्यास सुरूवात केली आहे. परीक्षेसाठी प्रत्येक पेपरला 10 मिनिटे जादा देण्याचे ठरविले आहे. त्याची कार्यवाही दहावी-बारावीच्या सर्व पेपर्सना होणार आहे.
दहावीच्या एका परीक्षा केंद्राच्या कक्षेत 3 उपकेंद्रे होती ती आता 5 झाली आहेत तर 5 उपकेंद्रे होती ती 10 करण्यात आली आहेत. 7 उपकेंद्रे होती ती 12 केली आहेत. अशा पद्धतीने उपकेंद्रांची वाढ झाल्याची माहिती बोर्डातर्फे देण्यात आली आहे. ज्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 100 पेक्षा जास्त आहे त्यांना प्राधान्याने त्यांच्याच शाळेत आसनव्यवस्था करण्यात येणार आहे.
प्रत्येक परीक्षा केंद्र-उपकेंद्र परीक्षेपूर्वी पूर्णपणे सेनिटाईझ करण्यात येणार आहेत. परीक्षा सुरळीत व्हावी तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी बोर्ड सर्व प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले.
परीक्षेबाबत फेरविचाराची : काही पालकांची मागणी
प्रतिनिधी / पणजी
पालकांच्या एका गटाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच गोवा शालान्त शिक्षण मंडळाला (बोर्ड) पत्रे व ई-मेल पाठवून नियोजित दहावी परीक्षेबाबत फेरविचार करण्याची मागणी केली आहे. कोरोना विषाणूचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नसताना परीक्षा घेण्याची घाई करू नये. ती पुढे ढकलावी किंवा इतर मार्गाने व पर्याय वापरून ऑनलाईन घ्यावी, अशी विनंती त्या पत्रातून करण्यात आली आहे.
देशभरात कोरोनाचा फैलाव वाढत असून गोव्याशेजारील महाराष्ट्र, कर्नाटक या दोन्ही राज्यांत कोरोना बळींची संख्या वाढतच आहे. गोवा राज्य ग्रीन झोन जाहीर केले असले तरी देशभर लॉकडाऊन चालू आहे आणि 17 मेनंतर ते पुन्हा वाढणार अशीच चिन्हे आहेत.
मास्क घालून मुले कशी पेपर लिहिणार?
परीक्षा काळात दोन ते तीन तास मास्क घालून मुले कशी पेपर लिहिणार? असे प्रश्न त्या पालकांनी त्या पत्रातून उपस्थित केले असून सामाजिक अंतर पाळण्याचा फज्जा उडालेला आहे. त्याचे पालन करणे शक्य होत नाही, याचा अनुभव अनेक लोकांनी घेतल्याचेही पत्रात म्हटले आहे.
ग्रीन झोनमध्येही परीक्षा घेण्याची अनुमती नाही
शाळा शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस बंद ठेवा असे मार्गदर्शक तत्व केंद्रासह राज्य सरकारने जारी केलेले असल्याने राज्य सरकार बोर्डाने परीक्षा घेण्याची घाई कशाला चालवली आहे? असा प्रश्नही करण्यात आला आहे. अशी घाई करून मुलांना-पालकांना संकटात टाकू नका, अशी विनवणी केली आहे. ग्रीन झोनमध्येही परीक्षा घेण्याची अनुमती केंद्रानेही दिलेली नाही.
आरोग्य, शिक्षण, औषध क्षेत्रातील मान्यवर मंडळींची समिती करून या विषयाचा अभ्यास प्रथम करण्यात यावा आणि नंतरच परीक्षा घेण्याचा विचार व्हावा अशी सूचना पत्रातून करण्यात आली आहे.