- मूल्यांकनाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता
ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला मात्र, या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार याबाबत संभ्रम कायम आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकार आज (28 मे) मुंबई उच्च न्यायालयात दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यात गुरुवारी संध्याकाळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात चर्चा झाली.
याबाबत अधिक माहिती देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, दहावी आणि बारावी परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा केली आहे. दुसऱ्या लाटेत संसर्ग कशापद्धतीने वाढतो आहे हे आपण पाहतोय. यात मुलांना धोका जास्त आहे. तसेच संभाव्या तिसऱ्या लाटेचा धोका आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.
या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकार राज्यातील कोरोना आरोग्य संकटाची सद्यपरिस्थिती, दहावीच्या निकालाचे निकष, अकरावीचे प्रवेश कसे होणार? आणि बारावीच्या परीक्षा कधी घेणार? यासंदर्भात आपली भूमिका मांडणार आहे.
- बारावीबाबतही विचार होणार
बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रही अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. या परीक्षेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नुकत्याच दिल्या आहेत. याबाबत महाराष्ट्रासह अनेक राज्यांची बारावीच्या परीक्षा नको अशी भूमिका आहे. याबाबतही आज चर्चा होण्याची शक्यता आहे.