सर्वोच्च न्यायालयानेही याचिका फेटाळली : परीक्षा रद्द करण्यास नकार
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनाच्या भीतीमुळे राज्यात दहावी परीक्षा घेण्यासंदर्भात विभिन्न प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राज्य शिक्षण खात्याने 25 जून ते 4 जुलै या कालावधीत परीक्षा घेण्याचा ठाम निर्धार केला आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेखातर परीक्षा रद्द करण्याबाबत राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळून लावली असून परीक्षा घेण्यास कर्नाटक सरकारला हिरवा कंदील दाखविला आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सुरक्षेला धोका आहे. त्यामुळे दहावीची नियोजित परीक्षा रद्द करून शालेय अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे परीक्षेचा अंतिम निकाल घोषित करावा. यासाठी राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी याचिका बेळगावमधील मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या प्रमुख राजश्री नागराज यांनी दाखल केली होती. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एल. नागेश्वर राव, कृष्ण मुरारी आणि एस. रविंद्र भट यांच्या त्रिसदस्यिय खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. तसेच परीक्षा रद्द करणे शक्य नाही. सरकारच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करणे योग्य नाही. याबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेला निकाल योग्यच आहे, असे मतही खंडपीठाने व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे दहावी परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे.
राज्यात 25 जूनपासून दहावी परीक्षा घेण्यासाठी शिक्षण खात्याने सर्व तऱहेची तयारी केली आहे. राज्यातील 8.45 लाख विद्यार्थी परीक्षेसाठी हजर राहणार आहेत. तेलंगणा आणि तामिळनाडूनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात असल्याने तेथील राज्य सरकारांनी दहावी परीक्षा रद्द केल्या होत्या. कर्नाटकात कोरोनाचा प्रादुर्भाव वरील दोन्ही राज्यांच्या तुलनेने कमी आहे. शिवाय राज्य शिक्षण खात्याने आतापासूनच परीक्षेसंदर्भात सर्व सुरक्षा उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे परीक्षा रद्द करणार नसल्याचे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले होते.
विद्यार्थ्यांच्या हितासाठीच दाखल केली होती याचिका
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आल्याबाबत प्रतिक्रिया देताना राजश्री नागराज यांनी, न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे आपले कोणतेही नुकसान झालेले नाही. नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आपण याचिका दाखल केली होती. परीक्षा अत्यंत सुरळीतपणे पार पडावी इतकीच आपली इच्छा असल्याचे मत व्यक्त केले.