कॉपीबरोबरच विद्यार्थ्यांना थेट उत्तरे सांगण्याचे प्रकार वाढीस
प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकऱयांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर टाकण्यात आलेला पुरवणी परीक्षेचा पेपर मंगळवार दि. 29 रोजी होणार आहे. विज्ञान विषयाच्या पेपरने परीक्षेची समाप्ती होणार आहे. 2019-20 या शैक्षणिक वर्षातील दहावी परीक्षेत क श्रेणीत आलेल्या बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात अनुत्तीर्णांची संख्या अधिक आहे. यामुळे पुरवणी परीक्षेचा निकाल चांगला लागण्याचे आव्हान बेळगाव जिल्हा शिक्षण विभागासमोर असून म्हणूनच की काय कॉपीसारख्या गैरप्रकारांकडे कानाडोळा केला जात असल्याचे दिसून येत आहे.
कोविड-19 च्या संकटात परीक्षा लांबणीवर पडली. परिणामी बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाच्या निकालात घट झाल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागातर्फे देण्यात आले. मात्र, यामुळे पुरवणी परीक्षा देणाऱया परीक्षार्थींची संख्या वाढली आहे. त्यातच शाळा बंद असल्याने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी गुगल मीटचा आधार घ्यावा, त्रिसूत्रीची अंमलबजावणी करावी, अशा विविध सूचना देण्यात आल्या. मात्र परीक्षेवेळी कॉपीसारख्या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे पुरवणी परीक्षेत कॉपी प्रकाराबरोबरच थेट विद्यार्थ्यांना उत्तरे सांगण्याचे प्रकार होत असल्याची चर्चा सुरू आहे.
दरवर्षी पेपर तपासणी प्रक्रिया राबविताना संबंधित जिल्हय़ाच्या पेपरची त्याच जिल्हय़ात तपासणी करण्यात येत होती. यामुळे ओळखीच्या माध्यमातून वशिला लावून गुण वाढविण्याचे प्रकार घडत होते. यामुळे गत दोन वर्षांपासून जिल्हा पेपर बदलीअंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामुळे मूल्यांकनातील गैरप्रकारावर मर्यादा आल्या. यामुळे परीक्षा काळातच विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचे प्रकार वाढले आहेत. आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांकडे जाऊन प्रश्नांची उत्तरे सांगण्यात येत असून यामुळे प्रामाणिकपणे पेपर लिहिणाऱया विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
शिक्षणाधिकाऱयांनी लक्ष देण्याची गरज
दहावीच्या निकालात घसरण ही चिंतेची बाब आहे. यामुळे निकाल वाढीसाठी विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. मात्र, परीक्षेच्या दरम्यान कॉपीसारख्या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे कॉपीला थारा देण्यासारखेच आहे. यामुळे जिल्हय़ाची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी परीक्षा अचूक व्यवस्थेत व सीसीटीव्हीच्या नजरेखाली पार पडणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. याकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.