प्रतिनिधी/ पणजी
दहावी, बारावीची परीक्षा एप्रिल ते मे महिन्यात तसेच पाचवी ते नववीच्या परीक्षा एप्रिलमध्ये घेण्याची शिफारस करणारा प्रस्ताव शिक्षण खात्याने सरकारला पाठवला असून त्यावर योग्य तो निर्णय करण्याची सूचना केली आहे. शिक्षक संघटना, पालक शिक्षक संघ तसेच गोवा माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर विचार करून काय ते कळवावे, असेही खात्याने प्रस्तावात नमूद केले आहे. यावर आता सरकार काय निर्णय घेते त्यानुसार परीक्षांचे भवितव्य ठरणार आहे. शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाल्यामुळे परीक्षा पुढे नेण्याचा शिक्षण खात्याचा विचार आहे.
शिक्षण खात्याने सरकारला दिलेल्या प्रस्तावानुसार बारावीची परीक्षा 15 एप्रिलपासून तर 15 मे पासून दहावीची परीक्षा घेण्यात यावी, असे सूचविण्यात आले आहे. दोन्ही परीक्षा पावसाळ्यापूर्वी घेण्यात याव्यात. गोवा बोर्ड व शिक्षण खाते हे गोवा मुख्याध्यापक संघटना, प्राचार्य संघटनांकडे चर्चा करून तारखा ठरवतील, असे सांगण्यात आले. तसे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारला आता त्याबाबत लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे.