ऑनलाईन टीम / मुंबई :
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यंदा परीक्षा ऑफलाईन (लेखी परीक्षा) पद्धतीनुसार होणार आहे, अशी महत्वाची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा ही ठरलेल्या तारखेनुसारच होणार आहे. मात्र,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
त्या म्हणाल्या लेखी परीक्षेसाठी अधिकचा 30 मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षा सकाळी 11 ऐवजी 10.30 वाजता सुरू होणार आहे. तसेच, दहावी, बारावीची प्रात्याक्षिक (प्रॅक्टिकल) परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे. विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी साडेतीन तासांचा वेळ देण्यात आलेला आहे. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
- लेखी परीक्षा शाळेतच
पुढे त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा या त्यांच्या शाळेतच होणार आहेत. तर 80 गुणांच्या परीक्षांसाठी 30 मिनिटे तर 40 आणि 50 गुणांच्या परीक्षांसाठी 15 मिनिटांचा अधिकचा वेळ वाढवून दिला जाईल. तसेच दिव्यांग विद्यार्थांना प्रत्येक तासाला 20 मिनिटे वाढवून दिला जाणार आहेत.
- प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा असाईनमेंट पद्धतीनेे
दहावीच्या प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा असाईनमेंट पद्धतीने घेतल्या जाणार आहे. विशेष म्हणजे हे असाईनमेंट लेखी परीक्षा संपल्यानंतर शाळेत गृहपाठ पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
- … तर परीक्षा जूनमध्ये घेणार
एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेनमेंट झोन, संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन जून महिन्यामध्ये करण्यात येईल, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.