प्रतिनिधी/ पणजी
राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे आणि दिलेल्या निर्देशानुसार दहावी-बारावीचे वर्ग आज शनिवार दि. 21 नोव्हेंबरपासून सुरू होत असून सर्व प्रमुख शाळांनी गेले दोन दिवस त्याची पूर्व तयारी केली. वर्गाची स्वच्छता, सॅनिटायझेशन व इतर साफसफाई बहुतेक शाळांमधून करण्यात आली आहे.
कोरोना महामारी मुळे बंद असलेल्या शाळांचे हे वर्ग 5 महिन्यानंतर प्रथमच पहिल्या टप्यात चालू होत आहेत. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही तरीही दहावी-बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याची कार्यवाही आजपासून होत आहे.
वर्गात केवळ बारा विद्यार्थ्यांना अनुमती
मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या सर्व नियमांचे पालन करून हे वर्ग सुरू होत असून शिक्षण खात्याने काही दिवसापूर्वी त्याची एसओपी जाहीर केली होती. त्यानुसार एका वर्गात फक्त 12 मुलांनाच बसण्याची अनुमती देण्यात आली असून सर्वांना एकच दिवशी न बोलावता मर्यादित संख्येने एक, दोन, तीन दिवसाआड बोलावण्याची सूचना शिक्षण खात्याने केली आहे. त्यानुसार काही शाळांनी वेळापत्रक तयार केले असून त्याची अंमलबजावणी आज शनिवारपासून केली जाणार आहे.
सर्व काही मर्यादीत स्वरुपातच
शाळेत मुलांची गर्दी होणार नाही आणि कोरोनाचे सर्व नियम, अटी पाळल्या जातील अशा पद्धतीने वेळापत्रक ठेवावे असे शिक्षण खात्याने सुचवले आहे. मध्यंतर किंवा मोकळय़ा वेळेत मुलांनी-शिक्षकांनी गर्दी करू नये, खाण्याचा डबा, पाण्याची बाटली, पुस्तके, वहय़ा यांची देवाणघेवाण नको, शाळेत कोणी थुंकू नये, प्रवेशद्वारावर मुले, शिक्षक, पालक, कर्मचाऱयांची, इतरांची थर्मल तपासणी करावी असेही एसओपीत म्हटले आहे. प्रसाधनगृहे (टॉयलेट) पूर्णपणे दररोज स्वच्छ करावीत, शारीरिक शिक्षणाचे तास नकोत, विद्यार्थी, मेळावा, व्याख्याने नकोत, फक्त मर्यादित संख्येने शिकवणीचे काम करावे, आलटून पालटून मुलांना बोलवावे असेही शिक्षण खात्याने सूचित केले आहे.