गोवा बोर्डाचे अध्यक्ष भगिरथ शेटय़े यांच्याकडून स्पष्ट
प्रतिनिधी / पणजी
गोव्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार असून त्या पुढे ढकलल्या जाणार नाहीत असा खुलासा गोवा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) केला आहे.
मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेटये यांनी सांगितले की कोरोना प्रतिबंधक एसओपी-नियम-अटी तसेच सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळून परीक्षा होतील. विद्यार्थ्यांची प्रत्येक परीक्षा केंद्रावर तापमान चाचणी (थर्मल स्कॅनिंग) करण्यात येणार असून एका वर्गात फक्त 12 मुलांनाच परीक्षेसाठी बसवले जाणार आहे. योग्य ते सामाजिक अंतर ठेवून बैठक व्यवस्था केली जाणार असून मास्क, सॅनिटायझर यांचा वापर बंधनकारक ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
परीक्षार्थींची सोय करण्यासाठी पुरेशी परीक्षा केंद्रे, उपकेंद्रे वाढवण्यात येतील असे सांगून शेटये म्हणले की तीन, चार परीक्षा झाल्यानंतर एखादा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाला तर त्याला जुनमधील परीक्षेला उर्वरीत परीक्षांसाठी बसण्याची संधी देण्यात येईल. तशी परिस्थिती आली तर संबंधित विद्यार्थ्यांने शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयामार्फत शिक्षण खात्याला पत्र पाठवावे लागेल व त्यानंतरच त्यास अनुमती मिळेल. गरज भासली तर संबंधित विद्यार्थी जूनमधील परीक्षा पूर्णपणे देऊ शकतात असेही असेही शेटये यांनी सांगितले. परीक्षेपुर्वी विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह मिळाला तर त्यांना परीक्षा देण्यासाठी स्वतंत्र आयसोलेशन परीक्षा केंद्रे तयार ठेवली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या : एनएसयुआयची मागणी
दहावी – बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात किंवा पुढे तरी ढकलाव्यात अशी मागणी एनएसयुआयच्या गोवा शाखेने केली आहे. गोव्यातील कोरोना रुग्ण 5000 च्या पुढे गेले असून त्याचा संसर्ग वेगाने वाढत आहे. तरीही सरकार गोवा बोर्ड परीक्षा घेण्याचा हट्ट धरुन विद्यार्थ्यांना संकटात टाकत असल्याचे एनएसयुआय गोवाचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकार सीबीएससी परीक्षा (दहावी) रद्द करते व बारावी परीक्षा पुढे ढकलते मग गोवा राज्याच परीक्षा ऑफलाईन घेण्याचा अट्टाहास कशासाठी करते? असा प्रश्न एनएसयुआयने केला आहे. कोरोना व्यवस्थापनाकडे सरकार दुर्लक्ष करीत असून रुग्ण वाढवण्यास अप्रत्यक्षपणे हातभार लावत आहे. गोव्यात अनेक कोरोना रुग्णांना बेड मिळणे मुश्कील झाले असून त्यांना गोमेकॉ हॉस्पिटलात जमिनीवर झोपण्याची पाळी आल्याचे एनएसयुआयने आपल्या पत्रकात नमूद केले आहे. कोरोनाचे संकट वाढत असतानाही सावंत सरकार विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना संकटात टाकत असल्याचा आरोप एनएसयुआयने केला आहे. परीक्षा घेण्यापूर्वी आणखी रुग्ण वाढण्याचा धोका आहे व परिस्थिती बिकट होण्याचे संकेत आताच मिळत आहेत. तेव्हा वेळीच सरकारने सावध होऊन 10/12 परीक्षा ऑनलाईन घेणे किंवा पुढे ढकलणे यावर विचार करुन निर्णय घ्यावा, असे चौधरी यांनी पत्रकातून नमूद केले आहे.