मुंबई \ ऑनलाईन टीम
दहावीची परीक्षा रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेऱे ओढले आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन ते तीन दिवसांत दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितले आहे. ते सिंधुदूर्गमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, परवा आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा हा विषय मांडण्यात आला होता. एक दोन दिवसांत संबंधित खात्याचे मंत्री, सचिव यांना रिपोर्ट तयार करण्यास सांगितलं आहे. त्यानंतर निर्णय घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
राज्य मंडळ वगळता अन्य शिक्षण मंडळांनी दहावीची परीक्षा रद्द करताना विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करणार, निकाल कसा देणार याचा निदान विचार तरी केला आहे. राज्य मंडळ मात्र परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करून मोकळं झालं आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात लोटणाऱ्या राज्यातील शिक्षणव्यवस्थेला आता देवच तारेल, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयच का रद्द करू नये, असा प्रश्न देखील न्यायालयाने सरकारला विचारला आहे.