प्रतिनिधी / पणजी
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची गंभीर दखल घेऊन सरकारने दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या असून नवीन तारखा 30 एप्रिलनंतर एकंदरीत परिस्थिती पाहून जाहीर करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. या निर्णयामुळे चिंताग्रस्त विद्यार्थी – पालक यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा संभ्रम काही प्रमाणात तरी दूर झाला आहे.
अनेक पालक – विद्यार्थी तसेच पालक शिक्षक संघ, विरोधी पक्ष यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. एनएसयुआयने तर पर्वरी येथे गोवा बोर्ड कार्यालयाकडे तसेच आल्तिनो – पणजी येथील मुख्यमंत्री निवासाकडे मोर्चा नेऊन निदर्शने केली होती. ती मागणी एकदाची पूर्ण झाली असून विद्यार्थ्यांनी अभ्यास चालूच ठेवावा. तयारी करावी असा कानमंत्र डॉ. सावंत यांनी दिला आहे. 15 दिवसांची मुदत ठेवून त्या अगोदर परीक्षांची तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शाळा पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून मुलांना शाळेत बोलावू नये. परीक्षा घेऊ नयेत, असेही त्यांनी बजावले आहे.