सचिव सत्यवान सोनवणे यांना निवेदन
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 65 टक्के ऑनलाईन तर 10 टक्के ऑफलाईन अभ्यासक्रम शिकवला आहे. तसेच ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. तरीदेखील दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पध्दतीने होणार अशी घोषाणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे. ऑनलाईन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करून शासनाने दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घ्याव्या, या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव सत्यवान सोनवणे यांना दिले.
निवेदनात म्हंटले आहे, 4 ऑक्टोबरपासून 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारीत दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईन पध्दतीने होणार, असा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. परंतू कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनानेच ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय यापुर्वी घेतला होता. ऑनलाईन शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलेले नाही. तर काही महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षणच दिलेले नाही. त्यामुळे काही शाळा-महाविद्यालयांनी अभ्यासक्रम पूर्ण केलेला नाही. यात विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे. मग त्यांनी परीक्षा कशा द्यायच्या. तसेच परीक्षा ऑफलाईन घेतली आणि एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली तर शासन जबाबदार राहणार काय? याचे उत्तर प्रशासनाने द्यावे,असा सवाल विद्यार्थ्यांनी विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिवांना विचारला. त्यामुळे दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाले होते. यावेळी रमेश मोरे, अशोक पोवार, प्रतिक काटकर, आथर्व पाटील, महेश जाधव, राजू मालेकर, भाऊ घोडगे, लहुजी शिंदे, संस्कृती पाटील, विपूल भंडारे, अब्दुल मुलाणी, दिपक नडमाने आदी उपस्थित होते.