सोशल डिस्टंन्सिंग आवश्यक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहावी, बारावी परीक्षांसाठी राज्यांच्या परीक्षा मंडळांना आयोजनाची परवानगी दिली आहे. याकरता लॉकडाऊनच्या नियमामध्ये काहीप्रमाणात शिथिलता दिली आहे. विद्यार्थ्यांसमवेत पालक, वाहन व वाहतूक सेवा यामध्येही सूट दिली आहे. अमित शहा यांनी याबाबत ट्विटद्वारे याची माहिती दिली आहे.
विद्यार्थ्यांची असलेली जास्त संख्या आणि शैक्षणिक हित ध्यानात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तथापि परीक्षा हॉलमध्ये सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनी मास्क वापरावा, स्वतःचे सॅनिटायझर आणावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे. या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आणि नेण्यासाठी येणाऱया वाहनांना वाहतुकीचे विशेष परवाने दिले जातील, असेही त्यांनी म्हटले आहे.
याबाबत गृहमंत्रालयाने आदर्श रुपरेषा जाहीर केली आहे. आजारी विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. कोणतेही परीक्षा केंद्र कंन्टेमेंट भागात असणार नाही, परीक्षा केंद्रावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायजर आवश्यक, विद्यार्थी, शिक्षकांनाही मास्क अनिवार्य, विद्यार्थ्यांना नेआण करण्यासाठी बस सुविधा पुरवणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.