प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दहावीची परीक्षा जूनमध्ये तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे, असे काही पालकांचे मत आहे. तर परीक्षेची पूर्ण तयारी असताना परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे, असेही काही पालकांचे मत आहे. पण विद्यार्थी मात्र संभ्रमात असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे.
शाळा-कॉलेज बंद असल्यामुळे मुळातच विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडली आहे. आता तर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडील कल कमी होतोय की काय? अशी शिक्षण तज्ञांना भिती आहे. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षाची घडी विस्कटणार आहे. त्याचबरोबर बारावीनंतरची जेईई, नीट, सीईटी परीक्षा लांबणीवर जाणार. बारावीची परीक्षा रद्द केली तर जेईई, नीट परीक्षेला विद्यार्थी पात्रच ठरणार नाहीत. इंजिनिअरिंग, मेडीकलसाठी कोणत्या निकषावर प्रवेश देणार असा, प्रश्न शिक्षण तज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात तरूण भारतने पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला असता, अशा प्रतिक्रीया मिळाल्या.
विद्यार्थ्यांची नकारात्मक मानसिकता होण्याची भिती
वर्षभर शाळा-महाविद्यालये बंद होती. आधीच दोनवेळा परीक्षा पुढे ढकलली आहे. आता परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आणखीनच तणावाखाली जाणार आहेत. त्याचा परिणाम पालकांवरही होणार आहे. विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीवर गंभीर परिणाम होणार आहे. शासनाने शिक्षण तज्ञांच्या मदतीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. वारंवार विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत हुलकावणी दिली तर त्यांची नकारात्मक मानसिकता होण्याची भिती आहे. – आश्विनी मदने (पालक)
पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन कसे करणार
दहावी-बारावीचे काही विद्यार्थी वसतिगृहात राहून अभ्यास करीत आहेत. शासन आदेशानुसार एक महिन्यासाठी विद्यार्थ्यांना घरी जावे लागेल. आता अभ्यास करण्याची त्यांची मानसिकता राहिल की नाही याची भिती आहे. घरी घेवून जाताना विद्यार्थी-पालक यांचा स्वॅब तपासावा लागणार का? परीक्षा उशिरा झाल्या तर पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन कसे केले जाणार आहे.- वर्षा पाटील (पालक)
प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा
यंदा बारावीच्या नवीन अभ्यासक्रमामुळे प्रश्नपत्रिकेचे स्वरूपही बदलले आहे. बदलेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणारी ही पहिली बॅच आहे. शाळा सुरू झाल्यानंतर ज्यादा तास घेत अभ्यासक्रम पूर्ण केला. विद्यार्थ्यांच्या सराव चाचण्या घेतल्या. परीक्षा देण्याची पूर्णपणे तयारी असताना परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. पण कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करीत, विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता, मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करीत प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करावा. – प्रा. राजेंद्र कोळेकर (केएमसी कॉलेज)
विद्यार्थ्यांच्या डोक्यावर परीक्षेची टांगती तलवार
बारावीच्या परीक्षेवर पुढील भवितव्य अवलंबून असल्याने विद्यार्थ्यांनी जीव तोडून अभ्यास केला होता. एक महिन्याची दरी पडत असल्याने अभ्यासातील बहुतांश मुद्दे विसरून जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर परीक्षेची टांगती तलवार डोक्यावर कायम राहणार असल्याने अभ्यासाचे दडपण असणार. आता परीक्षा झाली असती तर आम्ही अभ्यासातून सुटलो असतो. त्याचबरोबर पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले असते. – जीतेंद्र लुनिया (डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज, कदमवाडी)