प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात दहावी आणि बारावी परीक्षा रद्द करण्याबाबत सध्या कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या दोन्ही परीक्षा होणार असल्याचे स्पष्टीकरण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिले आहे.
चामराजनगर येथे शुक्रवारी पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात 21 जूनपासून दहावी परीक्षा प्रारंभ करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. परीक्षा सुरू होण्यास दोन महिने एक आठवडा शिल्लक आहे. परीक्षा घेण्यासंदर्भात आरोग्य खात्याकडून अहवालही मागविण्यात आला आहे. लवकरच हा अहवाल शिक्षण खात्याला उपलब्ध होणार आहे. परीक्षेला अद्याप बराच वेळ आहे. त्यामुळे पुढे परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. विधापरिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी देखील दहावी परीक्षा रद्द न करण्याचा सल्ला दिला आहे. पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा घेण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या परीक्षा घेण्यासंदर्भात शिक्षण आणि आरोग्य तज्ञांशी लवकरच चर्चा करण्यात येईल. सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य नव्हे. कठीण परिस्थितीत पक्षभेद विसरून राजकीय पक्ष, धार्मिक नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आपत्तीप्रसंगी राजकारण करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.