गोवा शिक्षण मंडळाच्या कार्यकारी समितीचा निर्णय
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील दहावी-बारावीच्या (शिल्लक पेपर) परीक्षेबाबत गोवा बोर्डाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. सध्या सुरू असलेले लॉकडाऊन संपल्यानंतर म्हणजे 17 मे नंतर या दोन्ही परीक्षेबाबत निर्णय घेण्याचे तारखा जाहीर करण्याचे यावेळी ठरविण्यात आले आहे.
गोवा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यकारी समितीची बैठक काल सोमवारी झाली. बोर्डाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत हे अध्यक्षपदी होते.
केंद्राच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घ्यावा
लॉकडाऊन सुरू असताना परीक्षा घेणे योग्य नाही. मुलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे, असे मत बैठकीत व्यक्त झाले. परीक्षा घेण्याबाबत केंद्र सरकारने अर्थात मानव संसाधन विकास मंत्रालयाने हिरवा कंदिल दिलेला नाही तसेच त्याबाबत कोणत्याही सूचना केलेल्या नाहीत. कोणत्याही राज्यात अशा परीक्षा घेण्यात आलेल्या नाहीत. तसा निर्णयही झालेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतरच परीक्षेसंदर्भात केंद्राची मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन मगच तारखा निश्चित कराव्यात, असे ठरविण्यात आल्याची माहिती बोर्डाच्या प्रवक्त्यांनी दिली.
लॉकडाऊन संपल्यानंतरच होणार निर्णय
दहा दिवसांची पुर्वसूचना देऊन परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. 17 मेनंतर पुन्हा एकदा बोर्डाच्या कार्यकारी समितीची बैठक होणार आहे. त्यावेळी परीक्षेच्या तारखा त्यावेळची परिस्थिती पाहून, विचारात घेऊन ठरविल्या जातील, असे सांगण्यात आले. गोवा राज्य ग्रीन झोनमध्ये आहे आणि सध्या कोरोनामुक्त झाले तरी परीक्षा घेण्याची अनुमती केंद्राने दिलेली नाही. त्याची प्रतीक्षा करण्यात येत असून आता सुरू असलेले लॉकडाऊन संपल्यानंतर त्याबाबत निर्णय होऊ शकतो आता नव्हे, असे असे एकमत या बैठकीत झाले.
दहावी-बारावी परीक्षा 17 मे नंतर : मुख्यमंत्री
दहावी-बारावीच्या परीक्षा होणार हे निश्चित असून त्याची तारीख 17 मे नंतरच जाहीर करण्यात येईल. त्याची नोटीस 10 दिवस अगोदर देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. परीक्षेबाबत विद्यार्थी पालक यांच्या परिस्थितीची सरकारला जाणीव आहे. पालकांनी, शिक्षकांनी मुलांचे समुपदेशन करावे. परीक्षेची तारीख आता जाहीर केली आणि ती पुन्हा पुढे ढकलावी लागली तर सर्वांचाच गोंधळ होण्याची शक्यता आहे म्हणून 18 मे रोजी परीक्षेची तारीख जाहीर करता येणे शक्य आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.