दररोज तीन तासिका : शिक्षण खात्याकडून वर्गनिहाय वेळापत्रक प्रसिद्ध
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे मागील आठ महिन्यांपासून राज्यातील शाळा बंद आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून दहावी आणि बारावीचे वर्ग 1 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. त्याकरिता शिक्षण खात्याने तयारी केली आहे. यासंबंधी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा विषय, गणित, विज्ञान, समाज, शारिरीक शिक्षण व इतर विषयांचे एकूण 8 गट करून वर्ग घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी 10 ते 10.45 पर्यंत पहिला तास, 10.45 ते 11.30 पर्यंत दुसरा तास व 11.45 ते दुपारी 12.30 पर्यंत तिसरा तास घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
सहावी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यागम प्रणालीनुसार शिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून ते वर्ग देखील शाळांमध्ये 1 जानेवारीपासून सुरू होत आहेत. शाळेतील वर्गखोल्यांच्या संख्येनुसार 15 ते 20 विद्यार्थ्यांचा एक गट करावा. आवश्यकता भासल्यास प्रयोगशाळा, वाचनालय, शाळेच्या आवाराचाही वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
विद्यागम देखील आठ गटांमध्ये होणार असून प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी नववीचे वर्ग तर प्रत्येक मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे. काही प्राथमिक शाळांमध्ये आठवीचे वर्गही जोडलेले असल्याने तेथे बुधवारी देखील विद्यागमचे वर्ग घेता येणार आहे.
सहावी इयत्तेसाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी तर सातवी विद्यार्थ्यांसाठी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी वर्ग घ्यावेत. येथे देखील 45 मिनिटांचा एक तास असेल. दररोज सकाळी 10 ते दुपारी 12.30 पर्यंत तीन तास घेतले जाणार आहेत.
शाळांमध्ये वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन, विद्यार्थी आणि शिक्षकांना मास्कचा वापर, सामाजिक अंतर, सॅनिटायझर किंवा हॅन्डवॉशने हातांची स्वच्छता आदी सुरक्षा व्यवस्थेचे पालन करावे लागणार आहे. प्रत्येक वर्गखोलीत 15 ते 20 विद्यार्थ्यांसाठीच आसनव्यवस्था करण्याची सूचना शिक्षण खात्याने आदेशपत्रकाद्वारे दिली आहे.