कोरोना लसीकरणात देशाचा ऐतिहासिक विक्रम : ‘डब्ल्यूएचओ’कडून भारताच्या कामगिरीचे कौतुक
क्षण हा आनंदाचा…
भारताने आज इतिहास रचला आहे. 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्याबद्दल सर्व देशवासियांचे अभिनंदन. ही कामगिरी साध्य करण्यासाठी झटणाऱया डॉक्टर, परिचारिका यांच्यासह सर्व कोरोनायोद्धय़ांचे आभार. देशाची 130 कोटी जनता आज भारताच्या विज्ञान, उद्योग आणि सामूहिक भावनेच्या विजयाची साक्षीदार आहे.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मोहीम…
- सर्वाधिक डोस उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्र दुसऱया स्थानी
- देशातील अंदाजे 75 टक्के प्रौढांना पहिला डोस प्राप्त
- देशातील 31 टक्के लोकांनी घेतले लसींचे दोन्ही डोस
देशातील कोरोना लसीकरण (16 जानेवारी ते 21 ऑक्टोबर 2021)
- 1 ते 20 कोटी 131 दिवस
- 20 ते 40 कोटी 52 दिवस
- 40 ते 60 कोटी 39 दिवस
- 60 ते 80 कोटी 24 दिवस
- 80 ते 100 कोटी 31 दिवस
देशातील एकूण लसीकरण (संदर्भ : को-विन ऍप)
- पहिला डोस 71,08,36,154
- दुसरा डोस 29,51,63,132
- लसीचे दोन्ही डोस 1,00,59,99,286
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारताने गुरुवारी ऐतिहासिक विक्रम नोंदवत 100 कोटी डोसच्या आकडय़ाचा पल्ला गाठला. भारतात 16 जानेवारी 2021 ला लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर केवळ दहाव्या महिन्यात 100 कोटीचा टप्पा पार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणात 100 कोटीचा टप्पा पार केल्याबद्दल समाधान व्यक्त करताना देशवासियांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी याचे श्रेय आरोग्य कर्मचाऱयांना दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) पंतप्रधान मोदी, शास्त्रज्ञ, आरोग्य कर्मचारी आणि भारतातील सामान्य लोकांचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
देशासह जगभरामध्ये सुरु असलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये भारताने ऐतिहासिक यश मिळवल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. जानेवारी महिन्यापासून भारतात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला आरोग्य यंत्रणांमधील कर्मचाऱयांपासून सुरू झालेल्या या लसीकरणामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व वयोगटांचा समावेश करण्यात आला. याच नियोजनातून गुरुवारी भारताने 100 कोटी डोसचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. देशातील अंदाजे 75 टक्के प्रौढ लोकसंख्येला पहिला डोस मिळाला आहे, तर 31 टक्के लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. एकूण लसीच्या डोसपैकी 65 टक्केपेक्षा जास्त वापर ग्रामीण भागात झाला. भारत आता लसीकरणाच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येने कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच लहान मुलांच्या लसीच्या चाचणीलाही मंजुरी मिळाल्यामुळे येत्या काळात लसीकरणाच्या कार्यक्रमाला आणखी वेग येणार आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 279 दिवसात देशाने हे 100 कोटींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट गाठले आहे. भारताला सुरुवातीच्या 10 कोटी लसीकरणाचा आकडा पार करण्यासाठी 85 दिवस, 20 कोटी आकडा पार करण्यासाठी सुमारे 46 दिवस लागले. अर्थातच सुरुवातीचे 20 लाख डोस 131 दिवसात घेतले गेले. त्यापुढील 20 कोटी म्हणजे 21 ते 40 कोटीपर्यंतचे डोस 52 दिवसात देण्यात आले. त्यानंतर 40 ते 60 कोटी डोससाठी 39 दिवस, 60 कोटी ते 80 कोटी डोससाठी फक्त 24 दिवस लागले. आता 80 कोटीवरून 100 कोटींवर जाण्यासाठी 31 दिवस लागले आहेत. अखेरच्या टप्प्यात वेग कमी झाला असला तरी लसीकरण हय़ाच गतीने सुरू राहिल्यास देशात 216 कोटी लसीचे डोस मिळण्यासाठी आणखी 175 दिवस लागतील. म्हणजेच 5 एप्रिल 2022 च्या आसपास आपण हा आकडा पार करू शकतो, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
पंतप्रधानांच्या उपस्थितीत दिला 100 कोटीवा डोस
पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 कोटीव्या डोसचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. त्यांनी दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये उपस्थिती दर्शवत तेथील आरोग्य कर्मचाऱयांचे कौतुक केले. हा विक्रम आरोग्य कर्मचाऱयांच्या परिश्रमामुळे आणि देशवासियांच्या सहकार्यामुळे साध्य झाल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. याप्रसंगी पंतप्रधानांसमोरच बनारसमधील दिव्यांग अरुण रॉय यांना 100 कोटीवा डोस दिला गेला.
देशात ‘तिरंगी’ सेलिबेशन
महत्त्वाचा माईलस्टोन गाठल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने जोरदार सेलिबेशन करण्यात आले. लाल किल्ल्यावर 225 फूट लांब तिरंगा फडकवण्यात आला. या तिरंग्याचे वजन सुमारे 1400 किलो आहे. तसेच देशातील 100 ऐतिहासिक वास्तूंवर तिरंगा रूपात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या वास्तूंमध्ये औरंगाबादचा बिबिका मकबरा, दौलताबाद किल्ला, पुण्यातील शनिवारवाडा, आगा खान पॅलेस, मुंबईतील सीएसएमटीला रोषणाई करण्यात आली होती. तसेच गायक कैलाश खेर यांच्या आवाजात एक थीम साँग लाँच करण्यात आले असून याची धुन देशातील रेल्वेस्थानके, बसस्थानके अशा सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणार आहे.
भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले होते. त्यावेळी आरोग्य कर्मचाऱयांना आणि प्रंट लाईन वर्कर्सना ही लस देण्यात आली होती. यानंतर, लसीचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला. यामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लस देण्यात आली. देशात जेव्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली, तेव्हा कोरोना प्रतिबंधक लसीचा मोठा तुटवडा होता. कोरोना प्रतिबंधक लस देशातील सामान्य नागरिकांना मिळेल की नाही अशी शंकादेखील व्यक्त करण्यात येत होती. पण या सर्वांवर मात करत देशातील कोरोना लसीकरण मोहिमेने 100 कोटी डोसचा टप्पा पार केला आहे.
सर्वाधिक लसीकरण झालेली राज्ये… (संदर्भ : को-विन ऍप)
- उत्तर प्रदेश 12,31,57,757
- महाराष्ट्र 9,39,64,126
- पश्चिम बंगाल 6,93,76,640
- गुजरात 6,80,00,970
- मध्यप्रदेश 6,78,02,042
- बिहार 6,38,71,693
- कर्नाटक 6,21,55,522
- राजस्थान 6,11,47,138
- तामिळनाडू 5,43,19,859
- आंध्रप्रदेश 4,89,58,562
- केरळ 3,77,16,929
- ओडिशा 3,50,99,587
- तेलंगणा 2,95,47,715
- आसाम 2,67,51,945
- हरियाणा 2,51,18,258
- पंजाब 2,15,68,732
- छत्तिसगड 2,09,32,976