प्रतिनिधी/ रत्नागिरी
गणेशचतुर्थीला भक्तीपूर्ण वातावरणात घरी आलेल्या गणरायाची प्रतिष्ठापना व दहा दिवस मनोभावे पूजा-अर्चा केल्यानंतर 19 रोजी अनंत चतुर्दशीच्या 10 दिवसांच्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे. जिल्हय़ात 47 सार्वजनिक तर 33 हजार 718 घरगुती गणपतींना विसर्जनाने निरोप दिला जाणार आहे.
‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात शुक्रवारी गणेशचतुर्थीला मोठय़ा उत्साहात घरोघरी, गावागावात गणरायाचे स्वागत झाले. जिल्हय़ाच्या विविध भागात कोरोनाचे नियम पाळून गणपती बाप्पाचा उत्सव उत्साहात भक्तीभावाने साजरा झाला. जिल्हाभरात 1 लाख 66 हजार 539 घरगुती व 108 सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गेले 10 दिवस मोठय़ा दिमाखात लाडक्या बाप्पाचा उत्सव घरोघरी साजरा झाला. रविवारी 10 दिवसांच्या या गणपतींचे विसर्जन होणार आहे.
जिह्यात 47 सार्वजनिकव 33 हजार 718 घरगुती गणपतींचे विसर्जन शहर व ग्रामीण भागात विविध विसर्जन ठिकाणी होणार आहे. त्यासाठी त्या त्या स्थानिक स्तरावर योग्य ते नियोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी शहरात विसर्जनासाठीची विशेष व्यवस्था
रत्नागिरी नगर परिषदेने कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी माळनाका येथील व्यायामशाळेसमोर कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. याचबरोबर दैवज्ञ भवन, रिमांड होम परिसरातील हौद, मांडवी येथेही विसर्जनाचे नियोजन केले आहे. मांडवी येथे निर्माल्य संकलनासाठी कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. गणेश विसर्जनासाठी नगर परिषदेमार्फत वाहनाची व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. मांडवी जेटीकडे वाहनांना जाण्या-येण्यासाठी मार्ग नियोजन करण्यात आले आहे.