स्वराज्य अभियानचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनामध्ये दहा रुपयांची नाणी आणली. मात्र आता ही नाणी घेण्यास कर्नाटकमध्ये विशेष करून बेळगावमध्ये कोणीच तयार नाहीत. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने याबाबत जिल्हाधिकाऱयांनी आदेश काढून दहा रुपयांची नाणी चलनामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी स्वराज्य अभियान यांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रिझर्व्ह बँकेने 2009 साली दहा रुपयांची नाणी चलनात आणल्यानंतर केवळ एका वर्षातच ही नाणी बँकमध्येही घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चलनामध्ये ती नाणी घेण्यासच कोणी तयार नाही. वास्तविक बँकांनीदेखील ती नाणी स्वीकारली पाहिजेत. दहा रुपयांच्या नोटेच्या बदल्यात ही नाणी चलनात आणण्यात आली. मात्र काही बँकचालकच ही नाणी स्वीकारण्यास तयार नाहीत. अशा तक्रारी वारंवार होत आहेत.
बँका जर नाणी स्वीकारत नसतील तर सामान्य ग्राहक कसे घेतील, तेव्हा जिल्हाधिकाऱयांनी योग्यप्रकारे बँक अधिकाऱयांना मार्गदर्शन करून नाणी स्वीकारण्याबाबत सूचना करावी. याचबरोबर व्यवहारामध्येही नाणी चलनात आणण्यासाठी जनजागृती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सुधीर हेरेकर, मारुती सुतार, मल्लिकार्जुन कोंकणी, सदानंद मासेकर, मिलन पवार, उज्ज्वला गावडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.