ऑनलाईन टीम / सोलापूर :
काही गणेशोत्सव मंडळांनी कोरोना काळात ज्या पद्धतीने कोरोनाचे नियम पाळून उत्सवाची परंपरा कायम ठेवली, त्याच पद्धतीने दहीहंडी उत्सवाची परंपरा अखंड रहावी. म्हणून पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
आशिष शेलार हे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजावर सडकून टीका केली आहे.
महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. महाराष्ट्र सरकारने दहीहंडी मंडळं, गोविंदा पथकांच्या समन्वय समितीसोबत घेतलेल्या बैठकीनंतर दहीहंडीच्या आयोजनाला परवानगी नाकारली आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण-वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू, असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा, असा संदेश दिला आहे.
सरकारच्या या निर्णयारा विरोध दर्शवत, पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करण्यास परवानगी द्यावी आणि लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहीहंडीला शासनाने परवानगी द्यावी. कोरोनाची परिस्थितीची कल्पना सर्वांना असून त्याबद्दल खबरदारी व काळजी घेण्यास जी उत्सव मंडळे तयार आहेत. त्यांना गर्दी न करता आप-आपल्याला विभागात पारंपरिक पध्दतीने कमी उंचीच्या दहीहंडीला परवानगी शासनाने द्यावी. कमी गर्दीच्या आणि कमी उंचीच्या दहीहंडीला परवानगी दिली नाही तर सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही आशिष शेलार यांनी दिली आहे.