ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वषीप्रमाणे या वषीही गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घातली. मात्र दुसरीकडे दहीहंडी साजरी करण्याच्या मुद्दयावर मनसे अधिक आक्रमक झाली आहे. दहीहंडी साजरी करता यावी म्हणून मनसेचे ठाणे-पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज आमरण उपोषण सुरू केले. मात्र, पोलिसांनी जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे हाय हाय अशा घोषणा देखील दिल्या.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील गणेश उत्सव, दहीहंडी साजरी करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नियमांचे पालन करून दहीहंडी उत्सव साजरी करण्यास परवानगी द्या अशी मागणी ठाकरे सरकारकडे केली होती. या मुद्यावर मनसे ठाम असून त्यांनी आज सकाळपासूनच भगवती मैदानावर स्टेड उभारण्यास सुरूवात केली तसेच मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसेने आंदोलन सुरू आहे. या दरम्यान पोलिसांनी मनसेच्या नेत्यांसह अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलीस आणि अविनाश जाधव यांच्यात शाब्दीक वाद झाला.
नारायण राणे काल कुडाळमध्ये पोहोचले तेव्हा शिवसेनेच्या शाखेसमोर 100-150 लोक होते ते चालते. मात्र हिंदूंचे सण म्हटल्यावर कोरोनाचे कारण दिले जाते. राजकारण करताना कोरोना आडवा येत नाही. तसेच असा कोणता कोरोना आहे जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो?, असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी अविनाश जाधव यांच्या सह आठ जणांना ताब्यात घेतले आहे.