मुंबई/प्रतिनिधी
कोरोनाच्या संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडी साजरी करण्यावर सरकारने बंदी घातली आहे. परंतु मनसेने दहीहंडी साजरी करणारच असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. मनसेचे संदीप देशपांडे यांनी राज्यात सुरु असलेली जन आशीर्वाद यात्रा आणि आंदोलनावेळी कोरोना नसतो का? असा सवाल करत आम्ही दहीहंडी साजरी करणारच, असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच त्यांनी आम्ही अस्वल आहोत, आमच्यावर खूप केस आहे, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला.
संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आम्ही दहीहंडी साजरी करणारच आहोत. आंदोलनावेळी आणि जन आशीर्वाद यात्रेवेळी कोरोना नसतो का? हिंदू आणि मराठी सणांवर बंदी का? कोरोनाची तिसरी लाट येणार याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? तुम्हाला वाटलं की तिसरी लाट येणार आहे का?, असा सवाल देशपांडे यांनी केला. आमच्यावर कितीही केसेस टाका. आम्ही अस्वल आहोत. आमच्यावर खूप केस आहेत, असंही ते म्हणाले.