पारपंरिक मच्छीमारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी / मालवण:
जिल्हय़ातील मत्स्य दुष्काळग्रस्त रापण व गिलनेटधारक पारंपरिक मच्छीमारांच्या वेदना मांडण्यासाठी बहुचर्चित मत्स्य दुष्काळ परिषद मालवण दांडी समुद्र किनारी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्हय़ातील मत्स्य दुष्काळग्रस्त पारंपरिक मच्छीमारांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन मालवणातील पारंपरिक मच्छीमारांतर्फे करण्यात आले आहे.
मत्स्य दुष्काळ परिषदेची तारीख निश्चित करण्यासंदर्भात आयोजित बैठकीस आबा वाघ, भाऊ मोरजे, संतोष शेलटकर, नितीन परुळेकर, महेंद्र पराडकर आदी उपस्थित होते. परिषद तीन तास चालणार आहे. प्रत्येक वक्त्याला म्हणणे मांडण्यासाठी वेळ ठरवून दिला जाईल. पारंपरिक मासेमारी प्रकारातील रापण, वल्हवून मासेमारी करणारे तियानीवाले, आऊटबोट इंजिनच्या साहय़ाने गिलनेट प्रकारातील मांड मासेमारी करणारे, न्हैय मासेमारी करणारे बल्यावधारक, मासे विक्रेत्या महिला, स्वत: मासेमारीला जाणाऱया महिला तसेच पारंपरिक मच्छीमारांच्या मासळीची वाहतूक करणारे हातगाडी व रिक्षा टेम्पो व्यावसायिक, बर्फ कारखानदार, मच्छीमार सहकारी संस्था, मासेमारी साहित्य विक्रेते, इंजिन दुरुस्ती करणारे, मासळी एजंट, लीलाववाले व हॉटेल, पर्यटन व्यावसायिक, मालवणातील व्यापारी, मत्स्य खवय्ये यापैकी प्रत्येकी एक प्रतिनिधी मत्स्य दुष्काळाबाबतचा लिखित अहवाल परिषदेत सादर करेल. नंतर परिषदेचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते विचार मांडतील. पारंपरिक मच्छीमार व त्यावर अवलंबून असलेल्या घटकांबरोबरच पारंपरिक मच्छीमारांशी संबंधित डॉक्टर्स, वकील, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी यांना आमंत्रित केले जाणार आहे.
‘मी मत्स्य दुष्काळग्रस्त’ मोहिमेस प्रतिसाद
मत्स्य दुष्काळ परिषदेत येणाऱया मच्छीमारांनी आपणास गेल्या काही वर्षात मत्स्य दुष्काळ कसा भेडसावतोय हे लिखित स्वरुपात मांडावे, यासाठी ‘मी मत्स्य दुष्काळग्रस्त’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानास मच्छीमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत मत्स्य दुष्काळाबाबतचा अहवाल अनेकांनी मत्स्य दुष्काळ परिषदेच्या आयोजकांकडे सादर केला आहे. लवकरच अन्य घटकांकडून हे अहवाल सादर होतील, असे मच्छीमारांनी सांगितले. पारंपरिक मच्छीमारांनी लेखी म्हणणे महेंद्र पराडकर (9421236201) यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले. परिषदेत सादर होणाऱया दस्तावेजाचे एकत्रीकरण करून पुस्तक रुपाने ते प्रकाशित करण्याचा आयोजकांचा मानस आहे.
मत्स्य दुष्काळ जाहीर करा!
शासनाने मत्स्य दुष्काळ जाहीर करावा, अशी जिल्हय़ासह राज्यातील पारंपरिक मच्छीमारांची मागणी आहे. ही मागणी मत्स्य दुष्काळ परिषदेत लावून धरली जाईल. शासनाची आकडेवारी काही सांगो पण राज्यातील सुमारे दोन लाख पारंपरिक मच्छीमारांना गेली काही वर्षे समाधानकारक मासे मिळत नाहीत. त्यांचे आर्थिक उत्पन्न प्रचंड घटलेय ही वस्तुस्थिती शासनाने मान्य करायलाच हवी ही भूमिका परिषदेत घेतली जाईल. शासनाकडे सातत्याने मत्स्य दुष्काळाबाबत पाठपुरावा करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जाणार आहे. या मागणीला पुस्तकरुपी अहवालाचे पाठबळ मिळेल, असे पारंपरिक मच्छीमारांनी सांगितले.
संपर्क अभियान गतिमान करणार
परिषदेस मोठय़ा संख्येने मच्छीमारांनी उपस्थिती दर्शवावी म्हणून मालवणातील पारंपरिक मच्छीमारांतर्फे जिल्हाभर संपर्क अभियान राबविले जात असून देवगड, मालवण व वेंगुर्लेतील पारंपरिक मच्छीमारांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत.