प्रतिनिधी/ रत्नागिरी
दिवसागणिक विस्तारत असलेल्या रत्नागिरी शहराच्या भावी 30 वर्षांचा विचार करून दांडेआडोम येथे सुमारे 15 कोटींचा अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प उभारला जाणार आहे. याचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या कंपाउंढड आणि अंतर्गत रस्त्यांचा 1 कोटी 65 लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच नगर परिषदेच्या सभागृहापुढे तो मांडला जाणार आहे.
शहरात सुमारे 22 टन कचरा दरदिवशी गोळा होतो. पण त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नगर परिषदेकडे आजही स्वतःच्या घनकचरा प्रकल्प नाही. शहरानजीकच्या दांडेआडोम येथे सुमारे अडीच हेक्टर जागेवर आता हा प्रकल्प होणार आहे. त्यामध्ये कचऱयावर 100 टक्के प्रक्रिया होणार आहे. यावर बायोगॅस प्रकल्प, खत प्रकल्प, वीज प्रकल्प, मैलाप्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. प्रदूषणही नाही किंवा काही वायाही जाणार नाही, असा दावा नगर परिषदेने केला आहे.
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानापूर्वीपासून नगर परिषद घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्नशील होती. शहराजवळच्या अनेक जागा निश्चित केल्या. मात्र त्याला विरोध झाला. अखेर दांडेआडोम येथील जागा निश्चित केली. नगर परिषदेने तेथे घनकचरा प्रकल्प प्रस्तावित केला. मात्र दांडेआडोम येथील ग्रामस्थांनीही त्याला विरोध केला. नगर परिषदे विरोधात ग्रामस्थ न्यायालयात गेले. अनेक वर्षे ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने याबाबत नगर परिषदेच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे घनकचरा प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरात गोळा होणाऱया कचऱयावर या घनकचरा प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाणार आहे. 100 टक्के कचऱयावर प्रक्रिया करण्याचे नगर परिषदेचे नियोजन आहे. कचरा डंप करून (गोळा करून) ठेवला न जाता त्यावर थेट प्रक्रिया केली जाणार आहे. प्लास्टिकवर प्रक्रिया करून ते सिमेंट कंपनीला दिले जाणार आहे. वैद्यकीय कचऱयाची स्वतंत्र व्यवस्था असल्यामुळे दुर्गंधी किंवा प्रदूषणाचा प्रश्नच निर्माण होणार नसल्याचे नगर परिषदेचे म्हणणे आहे. दांडेआडोम येथे आधुनिक घनकचरा प्रकल्प उभारण्याच्या कामाला गती आली आहे.