संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत भारताचा शेजारी देशावर हल्लाबोल
वृत्तसंस्था / संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत भारताने अंडरवर्ल्ड डॉन तसेच दहशतवादी दाऊद इब्राहिमचा मुद्दा उपस्थित केला आहे. इस्लामिक स्टेटप्रमाणेच दाऊदच्या टोळीसारख्या धोक्यांवरही आंतरराष्ट्रीय समुदायाने मिळून कारवाई करावी असे भारताने म्हटले आहे. सुरक्षा परिषदेत दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारीच्या खुल्या चर्चेदरम्यान भारताने 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांच्या गुन्हेगाराला ‘शेजारी देशात’ आश्रय मिळत असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तान शस्त्रास्त्र आणि अमली पदार्थांच्या तस्करीचे जागतिक केंद्र ठरला अहे. संयुक्त राष्ट्रसंघाने बंदी घातलेल्या दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांनाही तेथे आश्रय मिळत असल्याचे म्हणत भारताने पाकिस्तानचा भांडाफोड केला आहे.
डी कंपनी एक संघटित गुन्हेगारी टोळी असून सोने आणि बनावट चलनाची तस्करी करत होती. 1993 मध्ये मुंबई येथे साखळी बॉम्बस्फोट घडवून आणल्यावर ही टोळी दहशतवादी संघटनेत रुपांतरित झाली. इस्लामिक स्टेटविरोधात सामूहि कारवाईच्या यशाचे उदाहरण आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष केंद्रीत केल्यावर काय घडते हे दर्शविते. दाऊद इब्राहिम आणि त्याची डी कंपनी, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या संघटना तसेच बंदी घातलेल्या दहशतवाद्यांपासून असलेल्या धोक्यांवरही लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे भारताने सुरक्षा परिषदेत म्हटले आहे.
दहशतवाद रोखण्याची जबाबदारी
दहशतवादाला बळ पुरविणाऱया तसेच आश्रय देणाऱया देशांना त्यांच्या दुष्कृत्यांसाठी जबाबदार ठरविण्याची गरज आहे. दहशतवादी घटना रोखण्याची आणि त्यांचा वित्तपुरवठा थांबण्याची सदस्य देशांची प्राथमिक जबाबदारी असावी. खराब प्रशासन असणारे आणि वित्तीय संस्थांवर नियंत्रण नसणाऱया देशांना दहशतवादी संघटना आणि संघटित गुन्हेगार सहजपणे लक्ष्य करू शकत असल्याचे भारताने म्हटले आहे.